प्रतिनिधी / इचलकरंजी
कोरोनाच्या संकटात सर्वसामान्यांसह रिक्षाचालक आणि मालवाहतूक टेम्पोचालकांनाही अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. या कठीण प्रसंगात त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही आमदार प्रकाश आवाडे यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण उद्योग, व्यवसाय ठप्प झाले असून रिक्षा आणि तीनचाकी-चारचाकी टेम्पो व्यवसायसुध्दा बंद ठेवावा लागला आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर विविध अडचणी उभ्या ठाकत आहेत. त्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन योग्य तो मार्ग काढण्यासाठी आमदार प्रकाश आवाडे यांच्या उपस्थितीत शनिवारी सोशल डिस्टन्स पाळत ताराराणी पक्ष कार्यालयात शहरातील रिक्षा चालक मालक संघटना, मालवाहतूक टेम्पो संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली.
रिक्षा आणि टेम्पो व्यवसायावरच अनेक कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. पण मागील महिन्याभरापासून दोन्ही चाके थांबली असून त्यांच्यावर आर्थिक अरिष्ट कोसळले आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत रिक्षा, टेम्पो फिरला तरच चार घास मिळतात. पण सध्या करोनाच्या प्रादुर्भावामुळे अतिशय कठीण प्रसंग उद्भवला असून लोकप्रतिनिधी म्हणून शासन दरबारी पाठपुरावा करुन मदत मिळवून द्यावी, अशी मागणी उपस्थितांनी केली.
यावेळी श्रीमती नंदा साळुंखे, लियाकत गोलंदाज, प्रकाश लोखंडे, साताप्पा आदमापुरे, अल्ताफ शेख, मन्सुर सावनुरकर, महंमद शेख, अनिल बमण्णावर आदी प्रतिनिधी आणि प्रकाश दत्तवाडे, स्वप्निल आवाडे, सुनिल पाटील आदी उपस्थित होते.