वार्ताहर/ कराड
ऍटो रिक्षा चालक, मालकांच्या विविध मागण्यांसाठी ऍटो रिक्षा संघटना संयुक्त महासंघाच्या वतीने पुकारलेल्या राज्यव्यापी धरणे आंदोलनास पांठिंबा देत कराडच्या रिक्षा संघटनांनी कराडच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. तसेच आरटीओ अधिकारी चैतन्य कणसे यांना निवेदन देण्यात आले. एक महिन्यात मागण्या मान्य न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
प्रियदर्शनी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष अशोकराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात महाराष्ट्र राज्य ऍटो रिक्षा संघटना, प्रियदर्शनी रिक्षा संघटना व कराड तालुका रिक्षा संघटनांचे पदाधिकारी, चालक व मालक सहभागी झाले होते.
निवेदनात म्हटले आहे की, तडजोड दंड, नव्या वाहतुक शुल्कातील दरवाढ व फिटनेस विलंब प्रति दिन 50 रूपये दडांच्या कारवाईतुन ऍटो रिक्षाला वगळण्यात यावे. खुले परमीट बंद करण्यात यावे, फोटेव्दारे ऑनलाईन कारवाई करून होणारी दंडाची वसुली बंद करावी, कल्याणकारी रिक्षा महामंडळाची स्थापना करावी, शहरातील सर्व्हे करूण नवीन रिक्षा गेट करावेत. ऍटो रिक्षा पोट भरण्याचे साधन आहे जुलमी दंड भरण्याचे माध्यम नव्हे त्यामुळे परिवहन विभागाने ऍटो रिक्षाचालक व मालकांना दिलासा देण्याची मागणी करण्यात आली आहे.
याबाबत एक महिन्यात योग्य ती कार्यवाही झाली नाही तर राज्यभर लाक्षणिक उपोषण, आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा अशोकराव पाटील यांनी दिला आहे. तसेच पुढील आठवडय़ात राज्याची शिष्टमंडळ परिवहन आयुक्त व परिवहन मंत्र्यांना भेटून निवेदन देणार असल्याचे अशोकराव पाटील यांनी सांगीतले. यावेळी, वसंत देवाडिगा, मकसुद बागवान, अक्षय गवळी, राहुल बर्गे, राजेंद्र शेंद्रे, इम्रान बागवान, जहांगीर बागवान, विजय माने, सोमनाथ कुंभार रिक्षा चालक, मालक व पदाधिकारी उपस्थित होते.