प्रतिनिधी / सातारा :
महामार्गावरून सातारा शहरात प्रवेश करणाऱ्या वाढे फाटा, खेड चौक, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, अजंठा चौक, शिवराज येथे खड्डयांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या एक फुटांच्या खड्डयांमुळे प्रवाशांना जीवमुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे. या खड्डयांकडे प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) विद्यार्थी सेना यांच्या वतीने ‘खड्डे का बड्डे’ आंदोलन करण्यात आले. खड्डयांमध्ये बेशरमाचे वृक्षारोपण करून केक कापून महामार्ग रोखून धरण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष वैभव गायकवाड, निलेश गाडे, प्रतिक गायकवाड, रविंद्र बाबर, रामराजे शिंदे, राज काकडे, संदिप जाधव, सुशिल गायकवाड, अश्विन भिसे उपस्थित होते.
यावेळी जिल्हाध्यक्ष गायकवाड म्हणाले, जिल्ह्यामध्ये दोन टोलनाके आहेत. रस्त्यावरून सुखकर प्रवासासाठी टोल आकारला जातो. ज्या सुखकर प्रवासासाठी टोल आकारला जातो. त्या सुविधा मात्र मिळत नाहीत. सातारा हायवे आणि शहरामध्ये रस्त्यामध्ये खड्डे आहेत. की, खड्डयामध्ये रस्ते हे समजत नाही. येत्या 8 ते 10 दिवसात महामार्ग व शहरातील खड्डे न बुजवल्यास प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या टोलनाक्यांना (आनेवाडी/तासवडे) टोल वसुलकरू दिला जाणार नाही. जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली टोल बंद आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.