प्रतिनिधी/ सातारा
महामार्गावरून सातारा शहरात प्रवेश करणाऱया वाढे फाटा, खेड चौक, बॉम्बे रेस्ट्रॉरंट चौक, अजंठा चौक, शिवराज येथे खड्डय़ायांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या एक फुटांच्या खड्डय़ांमुळे प्रवाशांना जीवमुठीत घेवून प्रवास करत आहेत. या खड्डय़ांकडे प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) विद्यार्थी सेना यांच्या वतीने खड्डे का बड्डे हे आंदोलन करत खड्डय़ांमध्ये बेशरमाचे वृक्षारोपण करून केक कापून महामार्ग रोखून धरण्यात आला.
यावेळी जिल्हाध्यक्ष वैभव गायकवाड, निलेश गाडे, प्रतिक गायकवाड, रविंद्र बाबर, रामराजे शिंदे, राज काकडे, संदिप जाधव, सुशिल गायकवाड, अश्विन भिसे उपस्थित होते.
यावेळी खड्डे इथले मुजलेच पाहिजे, मुजलेज पाहिजे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा विजय असो, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी महामार्गाने चारचाकी, दुचाकी, अवजड वाहनांची वाहतूक सूरू होती. रिपाइंचे आंदोलन बघून अनेक प्रवाशांनी आपल्या वाहनांचा वेग कमी केला. आणि जीवघेण्या खड्डय़ांकडे प्रवाशांचे लक्ष वेधले होते. यावेळी जिल्हाध्यक्ष वैभव गायकवाड म्हणाले, जिह्यामध्ये दोन टोलनाके आहेत. रस्त्यावरून सुखकर प्रवासासाठी टोल आकारला जातो. ज्या सुखकर प्रवास सुविधासाठी टोल आकारला जातो. त्या सुविधा मात्र मिळत नाहीत. सातारा हायवे आणि शहरामध्ये रस्त्यामध्ये खड्डे आहेत. की, खड्डय़ांमध्ये रस्ते हे समजत नाही. येणाऱया काळात येत्या 8 ते 10 दिवसात महामार्ग व शहरातील खड्डे न मुजवल्यास दोन्ही ही प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱया टोलनाक्यांना (आनेवाडी/तासवडे) टोल वसूल करून न देता, टोल बंद आंदोलन जिल्हाध्यक्ष अशोक बापू गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करणार आहे.