प्रतिनिधी / सातारा :
काही स्वार्थी लोक बाजुला गेल्यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबडेकर गट पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी माझी निवड झाली. पक्ष बांधणीस सुरुवात करत असतानाच कोरोनाचे संकट आल्याने त्यात खंड पडला. मात्र, आता सर्व जातीधर्मातील लोकांना बरोबर घेत पुन्हा बांधणीचे काम सुरु करण्यात आले असून स्थानिक स्वराज्य संस्थाबरोबरच विधानसभेच्या 288 जागा स्वतंत्रपणे लढणार असून, समविचारी बरोबर येतील त्यांनाही बरोबर घेवून पुढे जाणार असल्याची माहिती रिपाइं आंबेडकर गट पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे यांनी दिली.
सातारा जिल्हा रिपाइं आंबेडकर गटातर्फे आयोजित निर्धार मेळाव्यास उपस्थितीत राहण्यासाठी आले असताना मेळाव्यापूर्वी शासकीय विश्रामगृहावर निकाळजे यांनी माध्यमांशी संवाद साधला. निकाळजे म्हणाले, 2018 साली रामदास आठवले यांनी दुसरा पक्ष काढला. त्यानंतर डॉ. मोहनलाल पाटील पक्षाध्यक्ष होते. मात्र नंतर 2019 मध्ये सर्व राज्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतील निर्णयानंतर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी माझी निवड करण्यात आली. आता सध्या पक्ष बांधणीचे काम सुरु करण्यात आले असून त्यासाठी महाराष्ट्रभर दौरे सुरु आहेत. वसई, विरार, ठाणे, नगर, औरंगाबाद येथे चांगला प्रतिसाद लाभला असून उर्वरित सर्व जिल्हय़ात सर्व जातीधर्मातील लोकांना यात सहभागी करुन घेत आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे कोणा एका समाजाचे नव्हते. त्यांनी केलेले कार्य अखिल विश्वासाठी वंदनीय असून त्यांच्या विचारांने वाटचाल करताना रिपाइं पक्ष तळागाळापर्यंत डॉ. आंबेडकर यांचे विचार पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.
यावेळी त्यांच्यासमवेत पक्षाचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार, पुणे जिल्हाध्यक्ष विकास साळवी, सातारा जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ तसेच सचिन खरात, जयवंत कांबळे आदी उपस्थित होते.