नाणार इंगळवाडीतील सोलकर यांची तक्रार
वार्ताहर /राजापूर
तालुक्यातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला समर्थन दिले म्हणून वाडीतील काही ग्रामस्थांनी दमदाटी करून वाडीतून वाळीत टाकत जमातीतूनही बहिष्कृत केल्याची तक्रार नाणार इंगळवाडी येथील अब्दुल मुनाफ सोलकर यांनी नाटे पोलीस ठाण्यात दिली.
राजापूर तालुक्यातील नाणार येथे प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला पूर्वीपासून गावातील लोकांचा विरोध होता. मात्र आपण हा प्रकल्प व्हावा अशा मताचे असून प्रकल्पाच्या समर्थनार्थ मुंबई येथे खासदार सुप्रिया सुळे यांच्या भेटीसाठी गेलो होतो. त्याचे फोटो वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर इंंगळवाडी गावातील मजिद भाटकर, मुबीन भाटकर, मोसीन साखरकर, सईद सोलकर, इरफान सोलकर, साहिल सोलकर, नवीद सोलकर, शादाब सोलकर, नियाज सोलकर आदींनी 1 मार्च रोजी मुजावर यांच्या मुलाच्या लग्नासाठी गेलो असता घेरून दमदाटी केल्याचे तक्रार अर्जात नमूद करण्यात आले आहे. ‘तू यापुढे गावामध्ये दिसता कामा नये, तुला आम्ही कायमचा वाडीतून वाळीत टाकलेला असून तुझ्यावर आम्ही जमातीने बहिष्कार घातलेला आहे. यापुढे येथे दिसलास तर तुला चपलांचा हार घालून गाढवावरून धिंड काढू व तुझा मुश्ताक सोलकर करून टाकू’ अशी धमकी दिल्याचे अब्दुल सोलकर यांनी तक्रार अर्जात नमूद केले आहे.
नाणार गावातील इंगळवाडी-मुस्लीमवाडीत सुमारे 100 घरे आहेत. सुमारे 10 वर्षापूर्वी गावातील मुश्ताक युसुफ सोलकर याचा खून झाला होता व त्यामध्ये आपण एक साक्षीदार होतो. कालांतराने या खुनातील संशयित आरोपींची कोर्टाने सुटका केली. मात्र तेव्हापासून आपण कुटुंबियांसह रत्नागिरी येथे वास्तव्य करतो. संबंधितांच्या अशा धमकीमुळे त्यांच्यापासून आपल्याला व कुटुंबाच्या जीवितास धोका असून त्यांच्याविरूद्ध कडक कारवाई करावी, अशी मागणी सोलकर यांनी केली आहे.