शहर वार्ताहर / राजापूर
राजापूर तालुका जनता परिषद, मुंबईने तालुक्यात नाणार परिसरात होऊ घातलेल्या रिफायनरी प्रकल्पाला पाठिंबा दर्शवला आहे. राजापूर तालुका जनता परिषदेच्यावतीने तसे निवेदन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिले आहे.
तालुक्यातील नाणार परिसरात होऊ घातलेल्या रिफायनरी प्रकल्पाला दिवसेंदिवस पाठिंबा वाढत आहे. तालुक्यातील 42 संस्थानी यापूर्वीच रिफायनरी प्रकल्पाला पाठिंबा दर्शवला आहे. आता त्यामध्ये राजापूर तालुका जनता परिषद मुंबईची भर पडली आहे. मुख्यमंत्र्यांना सदर केलेल्या निवेदनात, राजापूर तालुका सहय़ाद्रीच्या पायथा ते अरबी समुद्र असा भौगलिकदृष्टय़ा मोठा तालुका आहे. मात्र येथील लोकसंख्या कमी आहे. रोजगाराच्या संधी तालुक्यात उपलब्ध नसल्याने येथील तरूण मुंबई, पुण्याला स्थलांतरीत झाला आहे. याचा परिणाम येथील शेतीवर झाला आहे. सर्वात मोठा परिणाम हा शाळेतील पट घसरण्यावर झाला असून पटसंख्याअभावी शाळा बंद कराव्या लागत आहेत.
लोकसंख्या कमी असल्याने शासनाकडून येणारा निधी हा त्या प्रमाणात कमी येत आहे. त्यामुळे विकासदरही घसरला आहे. तालुक्याच्या विकासासाठी जैतापूर अणुऊर्जा व नाणार येथील रिफायनरी प्रकल्प लवकरात-लवकर कार्यान्वित झाला पाहिजे. त्यामुळे रोजगार उपलब्ध होईल व स्थलांतरित होणारा तरूणवर्ग गावातच थांबेल. नाणार प्रकल्पातील गावांशेजारील परिसर ठरवून टाऊन प्लॅनिग करण्याची गरज आहे.दळणवळणाची निर्मिती करावी. कोकण रेल्वेवरील राजापूर रोड रेल्वेस्टेशन मालवाहतुकीसाठी प्रस्तावित करण्यात यावा. तालुक्यात सुसज्ज रूग्णालय रोजगारभिमुख शिक्षण संस्था उभारण्यासाठी प्राधान्य द्यावे, असे नमूद केले आहे. नाणार परिसरात होऊ घातलेल्या रिफायनरी प्रकल्पासाठी आता मोठा पाठिंबा मिळत असून अनेक संस्थाही पुढे आल्या आहेत. त्यामुळे तालुक्यात रिफायनरी प्रकल्प होणे गरजेचे असून लवकरात-लवकर रिफायनरी प्रकल्प उभारणीसाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी केली आहे. जनता परिषदेचे अध्यक्ष हरिश रोग्ये, प्रमुख कार्यवाह मधुकर तोरस्कर, उपाध्यक्ष विजय गोवळकर, कार्याध्यक्ष विनोद चव्हाण, भरत कणेरी, डॉ.अलका नाईक, संतोष जोगले, संजय तावडे आदींनी मागणी केली आहे.