वार्ताहर/ राजापूर
राजापूर तालुका व्यापारी संघाने रिफायनरी प्रकल्प राजापूर तालुक्यातच व्हावा यासाठी पुढाकार घेतला असून प्रकल्पाला समर्थन देणारे निवेदन व्यापारी संघटनेच्या माध्यमातून शासनाला देण्यात आले आहे.
राजापूर तालुक्यातील नाणार परिसरात प्रस्तावित व नंतर निवडणुकीच्या काळात अधिसूचना रद्द झालेला रिफायनरी प्रकल्प राजापूर तालुक्यातच व्हावा, अशी मागणी जोर घेत आहे. कोरोना महामारीमुळे आलेले आर्थिक संकट आणि वाढलेली बेरोजगारी यामुळे रिफायनरी प्रकल्पाचे महत्व वाढले आहे. अशातच केंद्र शासनाने राज्य शासनाला या प्रकल्पाबाबत निर्णयासाठी दोन महिन्याचा अल्टीमेटम दिला. त्यानंतर हा प्रकल्प येथून जाऊ नये यासाठी समर्थक आक्रमक झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर पूर्वीपासूनच रिफायनरी प्रकल्पाच्या बाजूने असलेल्या राजापूर तालुका व्यापारी संघाने शासनाला निवेदन सादर केले आहे. प्रकल्पामुळे व्यापारामध्ये वाढ होतानाच रोजगाराचाही प्रश्न मार्गी लागणार असल्याने रिफायनरी प्रकल्पाला पाठिंबा असल्याचे व्यापारी संघटनेने या निवेदनात म्हटले आहे.
मंगळवारी रिफाईनरीचे समर्थन करणारे निवेदन नायब तहसीलदार शेळके यांच्याकडे सादर करण्यात आले. यावेळी संघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर, सचिव विलास पेडणेकर, खजिनदार दिनानाथ कोळवणकर, रज्जाक डोसानी, राजेंद्र नवाळे, विवेक गादीकर, बाळा पोकळे, कमाल मापारी यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.
राजापूर तालुक्यातील सागवे विभागातील आजी-माजी शिवसेना पदाधिकाऱयांनी काही दिवसांपूर्वी रिफायनरी प्रकल्पाला मंजुरी देण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. त्यानंतर व्यापारी संघानेही समर्थनार्थ निवेदन दिल्याने शासनाच्या भूमिकेकडे लक्ष लागून राहिले आहे.