वार्ताहर/ राजापूर
कोविडोत्तर जीवनमानासाठी रिफायनरी प्रकल्प हा कोकणच नव्हे तर राज्याला संजिवनी देणारा ठरेल असे मत शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख चंदुभाई देशपांडे यांनी व्यक्त केले आहे. सुशिक्षित वर्गाकडून रिफायनरीला वाढते समर्थन मिळत असून हा रोजगाराभिमुख प्रकल्प होणे गरजेचे आहे. याबाबत लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देणार असल्याचे देशपांडे यांनी सांगितले.
शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख आणि केंद्र शासनाकडून सौंदळ रेल्वे स्थानक खेचून आणणारे शिक्षणमहर्षी चंदुभाई देशपांडे यांनी रिफायनरी प्रकल्प राजापुरातच व्हावा आणि तालुक्यासह जिल्हय़ाचा आर्थिक कायापालट व्हावा अशी भूमिका घेऊन रिफायनरी समर्थनार्थ लढय़ात उडी घेतली आहे.
राज्यशासन मॅग्नेटिक महाराष्ट्रसाठी अकरा हजार कोटी रूपयांचा करार करते तेव्हा त्याचा गवगवा होतो आणि रत्नागिरी जिल्हय़ातील राजापूर तालुक्यात साडेतीन लाख कोटी रूपयांच्या प्रत्यक्ष व तेवढय़ाच अप्रत्यक्ष कोटींच्या गुंतवणूकीच्या प्रकल्पाला विरोध दर्शवला जातो ही बाब खेदजनक आहे. पर्यावरणाचा विचार करणे ही बाब महत्वाची आहेच, मात्र नव्या तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या आधुनिक रिफायनरी प्रकल्पाला हातचे जाऊ देणे म्हणजे भावी पिढी कोकण आणि महाराष्ट्रासाठी हितावह बाब नाही, याकडे देशपांडे यांनी लक्ष वेधले आहे.
या प्रकल्पाला सुरूवातीला काही वाडय़ांचा व ग्रामस्थांचा विरोध होता ही बाब सत्यच आहे. मात्र आता सुशिक्षित वर्गाचे समर्थन मिळत आहे. आज केवळ राजापूर तालुकाच नव्हे तर रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्हय़ातील जनतेने रिफायनरीला पाठींबा दिला आहे. कोविडोत्तर स्थितीत कोकणात माघारी परतलेल्या मुंबईकर चाकरमान्यांसाठी रिफायनरी प्रकल्प वरदान ठरणार आहे. त्यामुळे सौंदळ रेल्वे स्थानकाच्या यशस्वी लढय़ानंतर आपण रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनार्थ लढय़ात उतरत असल्याचे देशपांडे यांनी नमूद केले आहे.
राजकारण्यांनी देखील कोकणातील गरीबीकडे पाहीले पाहीजे, येथील ग्रामीण भागातील बंद घरांकडे पाहिले पाहीजे. केवळ शेतीवर उदरनिर्वाह होत नाही आणि शेकडो-हजारो आंबा कलमांच्या बागायती या मुठभर लोकांच्या असल्याने त्याचा बाऊ करणे योग्य नाही. रिफायनरीमुळे पर्यावरण आणि शेती तसेच बागायती, मासेमारी याच्यावर कोणताच परिणाम होत नाही हे सिध्द झालेले आहे. तेव्हा लक्षावधी कुटुंबांच्या चूली पेटवण्यास सक्षम असलेल्या रिफायनरी प्रकल्पाला अपशकून करून कोकणच्या भाग्यातील निखारे बनू नये असे आवाहन देशपांडे यांनी केले आहे.