ऑनलाईन टीम / मुंबई :
स्थानिकांच्या विरोधामुळे नाणार येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प रखडला आहे. मात्र, ठाकरे सरकार या प्रकल्पाबाबत सकारात्मक असल्याने त्यांनी या प्रकल्पासाठी पर्यायी जागेचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना रिफायनरी संदर्भात पत्र लिहिल्याचं सांगितलं जात आहे. या पत्रात मुख्यमंत्री ठाकरे यांनी रिफायनरीसाठी नाणार ऐवजी आता रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरच्या बारसू सालेगाव आणि पश्चिम भागातील गावातील काही गावांचा उल्लेख केला आहे. बारसू रिफायनरीसाठी जवळपास 14 हजार एकर जमीन आणि बंदरासाठी जवळपास 2414 एकर जागा देण्याची तयारी महाराष्ट्र सरकारची आहे. रिफायनरी प्रकल्प हा रत्नागिरीतच होणार हे जवळपास निश्चित झालं आहे, असेही ठाकरे यांनी या पत्रात नमूद केले आहे.
दरम्यान, कोकण दौऱ्यावर असलेले आदित्य ठाकरे म्हणाले की, नाणारमध्ये रिफायनरीचा प्रस्ताव होता. पण हा प्रकल्प नाणारमध्ये नको, अशी स्थानिकांची सातत्याने मागणी होत होती. म्हणून हा प्रकल्प नाणारमधून बाहेर हलवण्यात येणार आहे. चांगला मोठा प्रकल्प येत असेल तर तेथील भुमीपुत्रांसोबत चर्चा करुन त्यांचे हक्क कसे अबाधित राहतील, त्यांचे हक्क कसे मिळतील हे पाहणं सरकारची प्राथमिकता आहे. त्यांचा विश्वास संपादित करुन पुढं जायचं आहे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.