शहर वार्ताहर/ राजापूर
प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प नाणार परीसरातच झाला पाहीजे यासाठी रिफायनरी समर्थक समन्वय समितीच्या माध्यमातून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. या समितीच्यावतीने नुकतीच रायगडचे खासदार सुनील तटकरे यांची भेट घेतली असून राष्ट्रवादीचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांची भेट घालून घ्यावी अशी मागणी निवेदनामार्फत केली आहे.
तालुक्यातील नाणार परीसरात प्रस्तावित असलेला व यापुर्वीच्या युती शासन काळात शिवसेनेच्या प्रखर विरोधामुळे जमीन अधिग्रहणाची अधिसुचना रद्द झालेला रत्नागिरी ग्रीन रिफायनरी प्रकल्प राजापुर तालुक्यातच मार्गी लागावा या मागणीने आता जोर धरला असून नागरीकांमधून मोठय़ा प्रमाणावर प्रकल्पाला समर्थन मिळत आहे. अनेक संस्थानाही पाठींबा दर्शविला आहे. काही दिवसांपुर्वी रत्नागिरी दौऱयावर आलेले राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष व रायगडचे खासदार सुनील तटकरे यानी रिफायनरी प्रकल्पाला समर्थन देत स्थानिकांनी मागणी केली तर आपण त्यांची खासदार शरद पवार यांच्याशी भेट घडवून देऊ असे सुचक वक्तव्य केले होते. या पार्श्वभुमीवर शनिवारी सकाळी रिफायनरी समन्वय समितीने खासदार सुनील तटकरे यांची भेट घेतली.
रिफायनरी समर्थक समन्वय समितीची भूमिका समजून घेतल्यानंतर रिफायनरी समन्वय समितीला लवकरात लवकर खासदार शरद पवार यांच्याशी भेट घडवून देऊ असे आश्वासन खासदार सुनिल तटकरे यांनी दिले आहे. यावेळी अध्यक्ष ऍड.शशिकांत सुतार, ऍड.यशवंत कावतकर, कोकण जनकल्याण समितीचे अध्यक्ष पंढरीनाथ आंबेरकर, केशव भट, तुलसीदास शेटे, सुजित झिमण, राजु कीर, महेश शिवलकर, आनंद जोशी, विद्या राणे व फार्डचे सदस्य उपस्थीत होते.