अतिवाड ग्रामस्थांचा कँडल मोर्चा : महिना उलटूनही तपास न झाल्याने संताप
वार्ताहर / उचगाव
कु. रिया दीपक बेळगावकर हिच्या मृत्यूची कसून चौकशी व्हावी, आणि आरोपींना कठोरात कठोर शासन झाले पाहिजेत. यासाठी अतिवाड गावकऱयांनी गावांमध्ये कँडल मोर्चा काढून निषेध नोंदविला आणि रिया बेळगावकरला श्रद्धांजली वाहिली.
इंदिरानगर अतिवाड येथील रिया दीपक बेळगावकर या अकरा वर्षीय विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू झाला असून सदर विद्यार्थिनीचा मृत्यू होऊन आज जवळपास एक महिना होत आला. तरीही प्रशासनाकडून आणि पोलीस खात्याकडून म्हणावा तसा तपास करण्यात आला नाही. त्यामुळे तिचा मृत्यू संशयास्पद आहे. तेव्हा सदर आरोपींना त्वरित पकडून त्यांच्यावर कठोरात कठोर शासन करावे. रियाची आत्महत्या नसून तिचा मृत्यू संशयास्पद झाल्याची तक्रार रियाच्या वडिलांनी केली आहे. तेव्हा आरोपींना त्वरित अटक करावे, या मागणीसाठी अतिवाड गावकऱयांनी शनिवारी सायंकाळी गावामध्ये कँडल मोर्चा काढला आणि निषेध नोंदविला आणि तिला श्रद्धांजली वाहिली.
गावच्या मारुती मंदिरापासून मोर्चाला सुरुवात होऊन लक्ष्मी गल्ली, ब्रम्हलिंग गल्ली, इंदिरानगर मार्ग छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये येऊन त्या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी कँडल मोर्चामध्ये गावातील महिला, तरुण वर्ग आणि युवक वर्ग, ज्येष्ठ नागरिक, ग्राम पंचायत सदस्य आदी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. गावातील प्रुमख मार्गावरुन हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी महिला आणि तरुण वर्ग मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
रिया बेळगावकर हिचा 6 सप्टेंबर रोजी संशयास्पद मृत्यू झाल्याची तक्रार तिच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात नोंदविली आहे. सदर अकरा वर्षीय शालेय विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू झाला असून तिच्या मुत्युमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. तरी तिच्या मृत्यूची पोलीस खात्याने कसून चौकशी करावी, अशी मागणीही गावकऱयांनी केली आहे. आरोपींना त्वरित ताब्यात घ्यावे, या मागणीसाठी गावकरी जिल्हाधिकाऱयांनाही निवेदन देणार आहेत.
यावेळी गावकऱयांनी रियाच्या मृत्यूची चौकशी झाली पाहिजे, आरोपींना कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत गावकरी शांत बसणार नाहीत, असा इशारा देण्यात आला..