कृषी विधेयकाच्या विरुद्ध गौतम अदानी व मुकेश अंबानी यांच्या प्रतिमांचे केले तुकडे
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
जगात कोणतीही वस्तू अथवा जिन्नस उत्पादित करणाऱ्या उत्पादकालाच त्या वस्तूचे भाव ठरविण्याचा मुलभूत अधिकार आहे. मात्र जो शेतकरी सालभर ऊन-वारा-पावसाची तमा न बाळगता निसर्गावर भरवसा ठेवून अन्नधान्य अन्य शेती उत्पादने उगवतो. मात्र त्याचा भाव त्याला ठरविण्याचा अधिकार हिरावून घेणारे कायदे मोदी सरकारने पारित केले. अशा शेतकरी विरोधी कायदे अमलात आणणाऱ्या सरकारला जनतेचे सरकार म्हणून मिरविण्याचा नैतिक अधिकार सरकारला आहे का ? असा संतप्त सवाल रिलायन्स मार्केट समोर देशातील बडे भांडवलदार गौतम अदानी व मुकेश अंबानी यांच्या विरोधात निदर्शन करताना ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) केला.
बुधवार दि. ३० डिसेंबर २०२० रोजी सकाळी ११ वाजता देगाव नाका रिलायन्स मार्केट समोर सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्सच्या वतीने केंद्र सरकारने पारित केलेल्या ३ कृषी विधेयकांचा फायदा घेण्यासाठी टपून बसलेले बडे भांडवलदार मुकेश अंबानी यांच्या मालकीची असणाऱ्या रिलायन्स मार्केट समोर सिटूचे राज्य महासचिव अॅड.एम.एच.शेख यांच्या नेतृत्वाखाली निदर्शन करण्यात आले.
यावेळी कार्यकर्ते निदर्शनस्थळी पोहोचण्याआधी पोलीस प्रशासनाचा कडेकोट बंदोबस्त होता. निदर्शनासाठी येणाऱ्या कार्यकर्ते व नागरिकांना हुसकाविण्यात आले. कांही लोकांची वाहने जप्त केले. या दरम्यान ठीक ११ वाजता ज्येष्ठ नेते कॉ. आडम मास्तर हे निदर्शनस्थळी पोहोचताच कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी करत काळेझेंडे व निषेधाचे फलक दाखवत, जीओ सीमकार्ड तोडून गौतम अदानी व मुकेश अंबानी यांचा निषेध व्यक्त करण्यात गौतम अदानी व मुकेश अंबानी यांच्या विविध उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचा निर्धार केला. यावेळी आडम मास्तर व कॉ. एम.एच.शेख यांनी गौतम अदानी व मुकेश अंबानीच्या प्रतिमा फाडून तुकडे करण्यात आले.
यावेळी केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणावर टीका करताना आडम मास्तर म्हणाले कि, सरकार शेतकऱ्यांबाबत गंभीर नसून आंदोलनाची तीव्रता लक्षात येऊन सुद्धा त्याकडे हेतुपुरस्सर कानाडोळा करत आहे. याचे तीव्र पडसाद देशभर उमटतील शेतकऱ्यांसोबत आज सैनिक आणि कामगार खांद्यालाखांदा लावून आंदोलनात पूर्ण ताकदीनिशी उतरलेला आहे. अवघ्या कांही तासात संबंध देश त्यांच्या पाठीशी नक्कीच उभा राहील आणि असंतोषाची लाट उसळेल. तेंव्हा वेळीच सरकारने तीन कृषी विधेयक मागे घेतले पाहिजे अन्यथा सरकार विरुद्ध जनतेचे युद्ध अटळ आहे. असा गर्भित इशाराही त्या प्रसंगी दिला.
यावेळी नरसय्या आडम (मास्तर) यांच्या सह अनिल वासम, युसुफ शेख (मेजर), सलीम मुल्ला, नसीमा शेख, शेवंता देशमुख, शकुंतला पाणीभाते, विजय हरसुरे, बाळकृष्ण मल्याळ, दाउद शेख, विरेंद्र पद्मा आदि कार्यकर्त्यांवर फौजदार चावडी पोलीस ठाणे येथे अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला.