रिषभ पंतचे झुंझार अर्धशतक, भारत 6 बाद 357
मोहाली / वृत्तसंस्था
विराट कोहलीच्या 100 व्या लँडमार्क कसोटी सामन्यात रिषभ पंत 96 धावांच्या झुंझार खेळीसह केंद्रस्थानी राहिला. लंकेविरुद्ध सुरु झालेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर भारताने या जोरावर 85 षटकात 6 बाद 357 धावांपर्यंत जोरदार मजल मारली. दिवसअखेर रविंद्र जडेजा 82 चेंडूत 45 तर रविचंद्रन अश्विन 11 चेंडूत 10 धावांवर नाबाद राहिले.
5 हजार प्रेक्षकांच्या उपस्थितीत भारतीय फलंदाजांनी तुलनेने दुबळय़ा लंकन गोलंदाजीचा जोरदार समाचार घेतला. विराट कोहलीने 45 धावांची संयमी खेळी साकारताना विशेषतः डावखुरा फिरकी गोलंदाज लसिथ एम्बुल्डेनियाचा (28-2-107-2) उत्तम समाचार घेतला. एम्बुल्डेनियाच्या एका षटकात तर चक्क 22 धावांची लयलूट केली गेली. मात्र, विराट 45 धावांवर अचानक बाद झाला आणि एकच शांतता पसरली.
रिषभ पंतने नंतर चौफेर फटकेबाजी करत लंकन गोलंदाजांना सळो की पळो करुन सोडले. त्याने एम्बुल्डेनियाला मिडविकेटवरुन खेचलेला सिग्नेचर सिक्सर विशेष लक्षवेधी होता. आपल्या चौथ्या कसोटी शतकाच्या उंबरठय़ावर पोहोचलेल्या पंतला अनुभवी सुरंगा लकमलने (1-63) बाद केले. पंतच्या 97 चेंडूंच्या डावात 9 चौकार व 4 षटकारांचा समावेश राहिला. प्रशिक्षक राहुल द्रविड व कर्णधार रोहित शर्मा यांची पंतला पाचव्या स्थानी पाठवण्याची रणनीती यामध्ये सुपरहिट ठरली.
विराट म्हणतो, फॉर्म उत्तम असेल तर धावांची चिंता करणार नाही!
‘आपण सर्वजण माईलस्टोन्स आणि विविध पराक्रमांविषयी अधिक क्रेझी असतो. पण, अगदी या 100 व्या कसोटीसाठी देखील मी फारशी वेगळी तयारी केली नव्हती. एरवी ज्याप्रमाणे एखाद्या सामन्याची तयारी करतो, तीच पद्धत मी येथेही अवलंबली. याही पेक्षा महत्त्वाचे म्हणजे, जोवर फॉर्म उत्तम असेल, तोवर मी धावांची अजिबात चिंता करणार नाही’, असे स्पष्ट प्रतिपादन विराट कोहलीने केले. प्रदीर्घ कालावधीपासून एकही शतक झळकावलेले नसल्याने विराटवर टीका होत आली आहे. त्या पार्श्वभूमीवर तो बोलत होता.
‘तिन्ही क्रिकेट प्रकारात आणि आयपीएलमध्ये इतक्या प्रदीर्घ कालावधीत सातत्याने खेळत राहणे कठीण होते. मी स्वतःला या भरगच्च क्रिकेटमध्ये तंदुरुस्त राखू शकलो, हे सारे काही सहजपणे हाताळू शकलो, याचा सार्थ अभिमान वाटतो’, याचा विराटने येथे उल्लेख केला.
‘100 व्या कसोटी सामन्यात फलंदाजीसाठी उतरताना मी एखाद्या नवोदित खेळाडूप्रमाणे नर्व्हस झालो होतो. आपण पदार्पणाच्या सामन्यात उतरत आहोत, अशीच माझी अवस्था झाली होती. यानंतरही मी डावाला उत्तम सुरुवात केली. पण, याचे मोठय़ा खेळीत रुपांतर करता आले नाही, याचे शल्य आहेच. संघासाठी मोठी खेळी साकारणे आणि संघाला मजबूत स्थिती प्राप्त करणे, हा यापुढेही माझा प्राधान्यक्रम असेल’, असे भारताच्या या दिग्गज फलंदाजाने शेवटी नमूद केले.
बीसीसीआयच्या वतीने विराटचा खास सन्मान
100 कसोटी सामने खेळणारा केवळ 12 वा भारतीय ठरलेल्या विराट कोहलीचा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या वतीने पहिल्या दिवसाच्या खेळापूर्वी खास सन्मान करण्यात आला. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या हस्ते विराटला स्मृतिचिन्ह देऊन गौरवले गेले. विराटची पत्नी अनुष्का शर्मा व बंधू विकास कोहली यावेळी उपस्थित होते.
‘माझ्यासाठी हा खास क्षण आहे. माझी पत्नी येथे आहे आणि माझा भाऊ देखील स्टँडमध्ये आहे. आजवरच्या वाटचालीत सहकार्याबद्दल सर्व घटकांचा मी आभारी आहे. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे आणि या सर्व घटकांच्या सहकार्याशिवाय इथवर पोहोचणे शक्य झाले नसते. बीसीसीआयचा देखील मी आवर्जून आभार मानतो. प्रशिक्षक राहुल द्रविड माझे आदर्श आहेत. यू-15 च्या कालावधीतील त्यांच्यासोबतचे छायाचित्र मी आजही माझ्या घरात लावलेले आहे आणि आज 100 व्या कसोटी सामन्यात त्यांच्याकडूनच कॅप स्वीकारता आली, हे मी माझे भाग्य मानतो’, असे विराट याप्रसंगी म्हणाला.
बॉक्स
राहुल द्रविड म्हणाले, डबल ईट अप!
बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली, सचिव जय शाह, खजिनदार अरुण धुमाळ व उपाध्यक्ष राजीव शुक्ला याप्रसंगी स्टेडियममध्ये उपस्थित होते. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी विराटच्या कारकिर्दीची प्रशंसा करताना यापेक्षा दुपटीने भरभक्कम वाटचालीची त्याच्याकडून अपेक्षा नोंदवली.
मेहनत, शिस्त, साहस, कौशल्य, करारी बाणा, इच्छाशक्ती, एकाग्रता, हे सारे काही विराटकडे आहे. त्याने अव्वल दर्जा व सर्वोत्तमतेची याला जोड दिली. एखादा दिग्गज खेळाडू कसा घडतो, याचा हा उत्तम दाखला आहे, असे राहुल द्रविड याप्रसंगी म्हणाले.