रस्त्यावर दुतर्फा वाहने पार्क : नागरिकांचीही गदी, व्यावसायिकांनी रस्त्यावरच स्टॉल लावल्याने अडचण : प्रशासनाने लक्ष घालण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
शहरात विविध रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडी निवारणासाठी रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले आहे. पांगुळ गल्ली रस्त्याचे रुंदीकरण करूनही या ठिकाणी रस्त्यावरच वाहने पार्क करण्यात येत आहेत. त्यामुळे रुंदीकरणानंतरही वाहतूक कोंडीच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. तसेच अश्वथामा मंदिरापासून भेंडी बाजारपर्यंतच्या रस्त्यावर दुतर्फा वाहने पार्क करण्यात येत असल्याने समस्या निर्माण होत आहे.
पांगुळ गल्ली परिसर बाजारपेठेतील महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे या ठिकाणी नेहमीच गर्दी असते. सतत वाहनांची ये-जा आणि नागरिकांची गर्दी असते. रस्त्याची रूंदी कमी असल्याने येथील व्यावसायिकांसह नागरिकांना वाहतूक कोंडीचा फटका बसत होता. त्यामुळे महापालिकेने येथील रस्त्याचे रुंदीकरण करून रहदारी सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. पण रुंदीकरणानंतरही देखील रस्त्यावरच वाहने पार्क करण्यात येत असून, काही व्यावसायीक रस्त्यावर स्टॉल लावत आहेत. त्यामुळे वाहनधारकांना आणि पादचाऱयांना वाहतूक कोंडीच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे.
वादावादीचे प्रकार
हा परिसर गर्दीचा असल्याने वाहनधारकांनी व्यवस्थित वाहने पार्क करणे गरजेचे आहे. पण मिळेल त्या ठिकाणी हवी तशी वाहने पार्क करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. वाहनधारकांना याबाबत सांगितले असता व्यावसायिकांबरोबरच वादावादी करीत आहेत. त्यामुळे कालचा गोंधळ बरा अशी परिस्थिती पांगुळ गल्लीत झाली आहे. येथील वाहतूक कोंडीकडे महापालिका किंवा रहदारी पोलीस फिरकूनही पाहत नाहीत. त्यामुळे वाहनधारकांचे आणि रस्त्यावर बसणाऱया व्यावसायिकांचे फावले आहे. वाहनधारक, व्यावसायिक आणि रहिवाशांना वाहतूक कोंडीच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. रस्त्याचे रुंदीकरण करूनदेखील वाहतूक कोंडीची समस्या जैसे थे आहे. अश्वत्थामा मंदिर परिसरात पार्क करण्यात येत असलेल्या वाहनांमुळे आणि याठिकाणी असलेल्या काही दुकानांच्या साहित्यामुळे वाहतुकीस अडथळा ठरत आहे. त्यामुळे वाहनांच्या रांगा लागत असून वाहनधारकांना अडकून पडावे लागत आहे. पांगुळ गल्लीतील पार्किंगला शिस्त लावून होणाऱया वाहतूक कोंडीचे निवारण करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.