खानापूर रोडवरील मच्छेनजीक प्रकार
प्रतिनिधी /बेळगाव
रस्ता रुंदीकरणाचे काम करण्यात आले खरे, परंतु जुनेच लोखंडी खांब रस्त्याशेजारी बसविण्यात आले आहेत. खानापूर रोडवर मच्छेनजीक हा प्रकार घडला असून जुनेच लोखंडी खांब बसविण्यात आल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. जुने खांब असल्याने धोका निर्माण होत असून त्या ठिकाणी नवे खांब बसविण्याची मागणी करण्यात येत आहे.
पिरनवाडी कॉर्नरपासून खानापूर रोडचे चौपदरीकरण करण्यात येत आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याकडून रुंदीकरणाचे काम केले जात आहे. रुंदीकरणाचे काम करताना विद्युत खांब शिफ्टींग करण्यासाठी निधीची तरतूद करण्यात येते. मच्छेनजीकच्या भारतनगर येथे उच्चदाबाच्या विद्युतवाहिन्या आहेत. रुंदीकरणामुळे उच्च विद्युतदाबासाठी खांब बदलणे आवश्यक होते. परंतु निधी नसल्याचे कारण देत जुनेच खांब बसविण्यात आले आहेत. लोखंडी खांब जुने झाल्याने काही प्रमाणात खराब झाले आहेत.
नागरिकांकडून कोणतेही काम करून घेताना हेस्कॉमकडून नियमाकडे बोट दाखविण्यात येते. नव्या वसाहतीसाठी विद्युतखांब घालताना नवेच खांब हवेत म्हणून सक्ती करण्यात येते. परंतु अशाप्रकारे जुने खांब घालणे कोणत्या नियमावलीत बसते? असा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत. जुने लोखंडी खांब धोकादायक असून एखादा अपघात घडल्यास त्याची जबाबदारी हेस्कॉम की बांधकाम खाते घेणार? असा सवाल उपस्थित होत आहे.