@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस धक्कादायक वाढ होत असल्याचे चित्र आहे. मागील चोवीस तासात देशात 89 हजार 129 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर, मृतांचा आकडाही मोठय़ा प्रमाणात वाढत असल्याने चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. मागील चोवीस तासात 714 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या वर्षातील मृत रुग्णांच्या संख्येने गाठलेला नवा उच्चांक आहे. त्यामुळे आता भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 1 कोटी 23 लाख 92 हजार 260 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात आतापर्यंत 1 लाख 64 हजार 110 लोकांचा मृत्यू झाला आहे. 25 मार्चच्या दरम्यान दिवसभरात 50 हजारांजवळ असलेली रुग्णसंख्या अवघ्या दहा दिवसात प्रतिदिन 90 हजारांपर्यंत पोहोचल्याने धोक्याचे संकेत मिळाले आहेत.
देशात दर दिवसाला कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत जात आहे. गेल्या 24 तासात देशात 89 हजार 129 कोरोनाग्रस्त आढळून आले असून ही गेल्या सप्टेंबरपासूनची सर्वात मोठी वाढ आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजे 48 हजार रुग्ण महाराष्ट्र या एका राज्यातील आहेत. झपाटय़ाने वाढणाऱया रुग्णवाढीमुळे कोरोनाची ही दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा भयंकर असल्याचे दिसून येत आहे. याआधी एवढा मोठा आकडा अखेरचा 19 सप्टेंबर 2020 ला नोंदविण्यात आला होता.
आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, शुक्रवारी दिवसात देशात 44 हजार 202 जण उपचाराअंती बरे झाले असून आतापर्यंत एकंदर 1 कोटी 15 लाख 69 हजार 241 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशात सध्याच्या घडीला 6 लाख 58 हजार 909 सक्रिय रुग्ण आहेत. देशात मृतांचा आकडा 1 लाख 64 हजार 110 इतका झाला असून अखेरच्या चोवीस तासात तब्बल 714 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्णवाढीत महाराष्ट्र आघाडीवर आहे. तसेच छत्तीसगड, कर्नाटक, पंजाब, केरळ, तामिळनाडू, गुजरात आणि मध्यप्रदेशात सलग कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.
जवळपास साडेसात कोटी जणांना लस
कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता लसीकरणाच्या मोहिमेलाही वेग देण्यात आला आहे. गुरुवारपासून देशात तिसऱया टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात झाली आहे. मागील चोवीस तासात 30 लाख 93 हजार 795 जणांना कोरोना लस दिली असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावरून स्पष्ट झाली आहे. तसेच आतापर्यंत एकंदर 7 कोटी 30 लाख 54 हजार 295 जणांना लस दिल्याचेही स्पष्ट झाले आहे.
दिल्लीमध्ये वेगाने संसर्गबाधा
दिल्लीमध्ये कोरोना संसर्ग पुन्हा एकदा वेगाने वाढत आहे. राजधानीमध्ये कोरोनाची चौथी लाट आली असून आता दिल्ली विद्यापीठामध्येही याचा शिरकाव झाला आहे. दिल्ली विद्यापीठास संलग्न असलेल्या सेंट स्टीफन कॉलेजमधील 13 विद्यार्थी आणि 2 कर्मचाऱयांना कोरोनाची लागण झाली आहे. कॉलेजमधील विद्यार्थी आणि कर्मचारी पॉझिटिव्ह आढळल्यानंतर कॉलेज प्रशासनाने कॉलेजमधील सर्व उपक्रम बंद करण्याचे आदेश दिले आहेत. दिल्लीत शुक्रवारी दिवसभरात 3 हजार 594 नवे रुग्ण आढळले आहेत.
मृतदेहांच्या विल्हेवाटीची समस्या देशातील काही ठिकाणची परिस्थिती कोरोनामुळे बिकट होत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने होत असतानाच काही ठिकाणी दगावणाऱयांची संख्याही वाढत आहे. त्यातच आता छत्तीसगढमधील काही भागातील विदारक परिस्थिती समोर आली आहे. छत्तीसगडमधील दुर्ग जिल्हय़ात स्मशानभूमींमध्ये अंत्यसंस्काराची समस्या निर्माण होताना दिसत आहे. जिह्यात अवघ्या सात दिवसात 38 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. मागील दोन दिवसात मृतांची संख्या वाढली. अनेक मृतदेह स्मशानभूमीत आणण्यात येत असल्याने कोरोनाबाधित नसलेल्यांनाही समस्यांचा सामना करावा लागत आहे