राज्यात झपाटय़ाने वाढतोय कोरोनाचा फैलाव : शहरांबरोबरच ग्रामीण भागातही वाढ,अनेक केंद्रांमध्ये रुग्णसंख्या शंभराच्या पार
प्रतिनिधी / पणजी
गेल्या 24 तासात म्हणजे बुधवारी कोरोनामुळे 4 जणांचा जीव गेला असून एकूण सक्रिय रुग्णांनी पाच हजारांचा पल्ला गाठला असून ही संख्या 5112 झाली आहे. आतापर्यंतचे एकूण बळी 857 वर पोहाचले आहेत. बुधवारी 473 जण नवीन रुग्ण सापडले तर 245 जण बरे होऊन घरी परतले. संशयित रुग्ण म्हणून 78 जणांना गोमेकॉत भरती करण्यात आले असून 401 जणांना होम आयसोलेशन देण्यात आले आहे. आतापर्यंत मिळून एकूण 63815 जणांना कोरोनाची बाधा झाली असून त्यातील 57846 जणांना कोरोनातून मुक्ती मिळाली आहे.
मडगाव आरोग्य केंद्रात सर्वाधिक म्हणजे 591 जणांची कोरोना रुग्ण म्हणून नोंद झाली असून त्याच्या खालोखाल पर्वरी आरोग्य केंद्रातील कोरोना रुग्णांची संख्या 484 वर पोहोचली आहे. म्हापसा, पणजी, कांदोळी, फोंडा या आरोग्य केंद्रात रुग्णांची संख्या 300 पार झाली आहे. तेथे अनुक्रमे 341, 322 व 344, 387 अशी रुग्ण संख्या असून एकूण सात आरोग्य केंद्रांनी कोरोना रुग्णांची शंभरी गाठली आहे.
अनेक केंद्रामध्ये शंभराच्यावर रुग्ण
डिचोली 110, सांखळी 115, पेडणे 114, खोर्ली 118, चिंबल 180, शिवोली 162 असे वाढले आहेत. कासावली आरोग्य केंद्राने देखील रुग्णांची शंभरी पार केली असून तेथे 152 रुग्ण आहेत. वास्को 239 तर कुठ्ठाळी येथे 265 रुग्णांची नोंद झाली आहे. हळदोणा, चिंचणी, सांगे, नावेली, शिरोडा या आरोग्य केंद्रातील कोरोना रुग्णांची संख्या शंभरीकडे वाटचाल करीत आहे. एकंदरीत सर्व आरोग्य केंद्रातील रुग्णांची संख्या वाढत आहे.
कोरोनामुळे बळींच्या संख्येत होतेय वाढ
इतके दिवस 1, 2 ते 3 या संख्येने होणारे बळी वाढून काल बुधवारी 4 वर पोहोचले आहेत. रुग्णसंख्या, बळी वाढत असल्यामुळे चिंता यामध्ये वाढ होत असून कोरोनातून मुक्त होऊ या आशेने लोक लसीकरणासाठी वाढत आहेत. विविध मार्गाने गोव्यात आलेले 25 प्रवासी यांनाही कोरोनाने ग्रासल्याचे समोर आले आहे. देशासह गोव्यातही कोरोना रुग्ण वाढत असल्याने संसर्ग रोखण्यासाठी काहीतरी उपाययोजना चालू करा, अशी चर्चा सुरू झाली आहे. परंतु सरकारने हा वाढता संसर्ग असून गांभीर्याने घेतलेला दिसत नाही.
मास्क वापरतात, पण सामाजिक अंतराकडे दुर्लक्ष
देशासह गोव्यातही लोक कोरोना प्रबिंधक लस घेत आहेत. असे असतानाही या कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असल्याचे चित्र समोर येत आहे. गोव्यात तर गेल्या 15 दिवसात कोरोनाचे रुग्ण मोठय़ा संख्येने म्हणजे दरदिवशी 500 च्या आसपास वाढत आहेत. त्याच्या तुलनेत बरे होणाऱयांची संख्या मात्र कमी आहे. मास्क घालून लोक फिरत असले तरी सामाजिक अंतराचे पालन मात्र होत नाही.
विविध केंद्रातील रुग्णसंख्या विविध केंद्रातील कोरोना रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. डिचोली 110, सांखळी 115, पेडणे 114, वाळपई 52, म्हापसा 341, पणजी 322, हळदोणा 93, बेतकी 46, कांदोळी 344, कासारवर्णे 11, कोलवाळ 71, खोर्ली 118, चिंबल 180, शिवोली 162, पर्वरी 484, मये 33, कुडचडे 67, काणकोण 85, मडगाव 591, वास्को 239, बाळ्ळी 44, कासावली 152, चिंचणी 99, कुठ्ठाळी 265, कुडतरी 87, लोटली 71, मडकई 42, केपे 34, सांगे 93, शिरोडा 82, धारबांदोडा 60, फोंडा 387, नावेली 93. एकंदरीत सर्व आरोग्य केंद्रात रुग्णांची वाढ झाली असून ती कमी होण्याची चिन्हे सध्या तरी दिसत नाहीत.
मार्गदर्शक तत्वे पाळा, लस घ्या : मुख्यमंत्री प्रमोद सावंत
वाढत्या कोरोना संसर्गावर लॉकडाऊन हा पर्याय नाही. लॉकडाऊन केले तर लोकांवर उपासमारीची वेळ येईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट करून कोरोनाचे नियम – अटी सर्वांनी काटेकोर पाळाव्यात व लस घ्यावी म्हणजे कोरोना संसर्ग नियंत्रणात येऊ शकतो, असा दावाही त्यांनी केला. दरम्यान, हॉटेल व पर्यटन उद्योगातील सर्वांना लसीकरण करण्याची अनुमती केंद्र सरकारकडे मागण्यात आल्याची माहिती डॉ. सावंत यांनी दिली. तसेच लॉकडाऊन केले तर सर्वांची आर्थिक घडी पुन्हा एकदा विस्कटणार असल्याने हे करणे योग्य नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही तेच सांगितल्याचे डॉ. सावंत म्हणाले.