अचूक बातमी “तरुण भारत”ची, शुक्रवार, 4 जून 2021, सकाळी 10.45
● जिल्ह्यात वाढले 1588 नवे रूग्ण ● कोरोनामुक्ती दोन हजारावर ● आरे-कारी प्रकरणाने प्रशासकीय कारभार चव्हाट्यावर ● रुग्णांच्या सहवासितांच्या शोधाला वेग ● लॉकडाऊनचे नियम मोडणारांवर कारवाईचा धडाका ●जून महिन्याची सुरूवात दिलासादायक
सातारा / प्रतिनिधी :
जिल्ह्यातील कोरोना रूग्णवाढीचा आलेख कमी करण्यासाठी उशीरा का होईना पण जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे. कोरोना रूग्णांच्या नोंदी आणि आकड्यांच्या घोटाळ्यावर ‘तरूण भारत’ ने वाभाडे काढताच प्रशासन खडबडून जागे झाले. जिल्ह्याच्या शहरी भागासह ग्रामिण भागात कोरोना रूग्णांच्या संपर्कातील लोकांच्या शोधासाठी स्वतंत्र पथके तयार करण्याचे काम वेगाने सुरू झाले असून या सर्वांच्या तातडीने कोरोना चाचण्या करण्यासाठी प्रशासनाची गावपातळीवर तयारी सुरू आहे. नव्याने घेतलेल्या कडक लॉकडाऊनच्या निर्णयाला चारच दिवस झाले असून पुढील चार दिवसात प्रशासन नेमके काय भुमिका गेते आणि त्याची कशी अमलबजावणी करते याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे. दरम्यान शुक्रवारी आलेल्या अहवालात जिल्ह्यात 1588 नव्याने बाधित झाले आहे.
‘आरे-कारी’ प्रकरणाचे पडसाद उमटू लागले
रूग्णवाढीच्या कृत्रिमरित्या पॉझिटिव्हीटीचा ‘तरूण भारत’ ने पर्दाफाश केल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. या भोंगळ कारभाराचा उदाहरणादाखल शोध घेत तरूण भारतने सातारा तालुक्यातील ‘आरे-कारी’ प्रकरण पुराव्यासह उघडकीस आणल्याने प्रशासन पुरते तोंडघशी पडले आहे. एकाच कुटूंबातील दहा रूग्णांची एकदाच तपासणी करून ते सर्व दोनदा पॉझिटिव्ह आल्याचा अहवाल प्रशासन दरबारी नोंद आहे. हे वृत्त प्रसिद्ध होताच शुक्रवारी याचे सोशल मिडीयासह जनमाणसात तीव्र पडसाद उमटू लागले. या प्रकरणाबद्दल अनेकांनी प्रशासकीय कारभारावर नाराजी व्यक्त करत मनमोकळेपणाने सोशल मिडीयावर ताशेरेही ओढले आहेत. हे उदाहरण म्हणून एक प्रकरण जिल्हावासियांसह लोकप्रतिनिधींसमोर आले. असा मानसिक त्रास किती रूग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना होऊन जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट एकाचे दोन होऊन फुगला असावा याबाबत आता उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
गावोगावी कोरोना चाचण्यांची गती वाढणार
मे महिन्यात कोरोना रूग्णवाढीचा आलेख वेगाने वाढला असतानाच जून महिन्याच्या सुरूवातीला हा आलेख कमी झाला. लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात अमलबजावणीत काहीसी ढिलाई झाली होती. मात्र नव्याने कडक लॉकडाऊन वाढल्यानंतर जिल्ह्याच्या ग्रामिण भागावर प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. प्रत्येक गावात कोरोना रूग्णांच्या चाचण्या वाढवण्याचे आदेश देण्यात आले असून त्यासाठी रूग्ण सापडल्यानंतर त्याच्या सहवासातील सर्वांचा शोध घेण्याची मोहिम वेगावली आहे. पॉझिटिव्ह आलेल्यांवर तातडीने उपचार करतानाच निगेटिव्ह आलेल्यांना क्वारंटाईन राहण्याच्या सक्त सुचना देण्यात येत आहेत.
जून महिन्यात लाट कमी येईल?
सातारा जिल्ह्यात दुसरी लाट अजूनही सुरूच असल्याने जिल्ह्यात कडक लॉकडाऊन कायम आहे. रूग्णवाढीचा आकडा अपेक्षित असा कमी होत नाही तोपर्यंत निर्बंध शिथील होण्याची शक्यता कमी आहे. दरम्यान एप्रिल आणि मे महिन्याच्या तुलनेत जून महिन्याची सुरूवात काहीसी दिलासादायक झाली आहे. जून महिन्याच्या 1 तारीख ते 4 तारखेपर्यंत रूग्णवाढ मंदावली आहे. रूग्णवाढीचा आलेख खाली आला आहे. मात्र सातारा, कराड,खटाव तालुक्यातील मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्न गरजेचे आहेत. रूग्णवाढीचा कोणत्याही घोळाशिवाय असाच मंदावत राहिला तर जून महिन्यात जिल्हा दुसरया लाटेच्या विळख्यातूून बाहेर पडेल अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
बुधवारी जिल्हय़ात एकूण बाधित 1588, एकूण मुक्त 5107, एकूण बळी 32
बुधवारपर्यंत जिल्हय़ात एकूण नमुने -810445, एकूण बाधित – 172433, घरी सोडलेले -148052, मृत्यू -3730, उपचारार्थ रुग्ण-20648