बार्शी /प्रतिनिधी
बार्शी शहर व तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर विनाविलंब तात्काळ प्रशासन व लोकप्रतिनिधीनीं यांची संयुक्त बैठक घेऊन कडक उपाययोजनांची अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याचे विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे यांनी म्हटले आहे. सद्यस्थितीत वाढणाऱ्या रूग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर विचार केला असता सदर पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्यावाढीचा मुख्य स्त्रोत असणारे रुग्णालय, उपचार करणारी सेंटर येथील दुरावस्था व व्यवस्था या संदर्भाने तात्काळ कडक कार्यवाहीची आवश्यक्यता असल्याचेही अक्कलकोटे यांनी म्हटलंय.
कोरोनाची वाढणारी साखळी तोडणे, कामी योग्य त्या उपाययोजना हाती घेणे गरजेचे आहे. पॉझिटिव्ह रुग्ण संख्येबरोबरच मृत्यू रुग्ण संख्यांची देखील वाढ होते आहे. हे चित्र अत्यंत चिंता वाढवणारे आणि क्लेशदायक आहे. तरी आपल्या स्तरावरून वरिष्ठ अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी व स्थानिक प्रशासन यांची संयुक्त बैठक घेऊन उपाय योजना संदर्भात धाडसी निर्णयाची गरज असल्याचं पत्र अक्कलकोटे यांनी पालकमंत्री आणि जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांना लिहिले आहे. दरम्यान, एकाच दिवसात 30 रुग्णांची वाढ झाल्याने तालुक्यातील नागरिकांमधूनही जनता कर्फ्यूची मागणी होत आहे. सोशल मीडियावरुन नागरिकांकडून बार्शी प्रशासनाने ठोस पाऊल उचलण्याचं आवाहन करण्यात येत आहे. सबजेल येथील 12 कैदी पॉझिटीव्ह आल्याने तीही चिंताजनक बाब झाली असल्याचे म्हंटले आहे.