मुंबई \ ऑनलाईन टीम
कोरोनाचा वाढता प्रसार पाहता राज्य सरकारने लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला होता. लॉकडाऊनमुळे रुग्णसंख्येत काही प्रमाणात घट होताना दिसत आहे. मुंबईतील कोरोना परिस्थितीही नियंत्रणात आलेली असून, मुंबई मॉडेलचं देशभरातून कौतुक होत आहे. मुंबई आणि राज्यातील परिस्थितीवर समाधान व्यक्त करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
संदीप देशपांडे यांनी यासंबंधी एक ट्विट केलं आहे. त्यांनी म्हटले आहे की, आज महाराष्ट्रातील रुग्ण संख्या कमी होते आहे. चांगली गोष्ट आहे. त्याच श्रेय मुंबई मॉडेल, मुख्यमंत्री, पालकमंत्री सगळेच घेत आहेत. म्हणजे रुग्ण संख्या वाढली की जनता बेजबाबदार, कमी झाली की सरकार आणि प्रशासनाच यश, अशी दुटप्पी भूमिका सरकार आणि प्रसार माध्यमं कशी घेऊ शकतात?, असा सवाल संदीप देशपांडे यांनी केला आहे.
राज्यात लॉकडाऊन लावल्यानंतर कोरोना रुग्णसंख्येचा आलेख खाली घसरताना दिसत आहे. राज्यात सोमवारी आढळून आलेल्या रुग्णंसख्येपेक्षा कोरोनावर मात करून घरी परतलेल्या रुग्णांची संख्या दुप्पट होती. त्यामुळे राज्यासाठी हे दिलासादायक चित्र आहे. लॉकडाऊनचा पर्याय कोरोना आटोक्यात आणण्यासाठी काही अंशी उपयोगी पडत आहे. तसेच राज्यात मोठ्याप्रमाणात लसीकरणाची मोहीम राबविली जात आहे.
–