पुणे\ ऑनलाईन टीम
सध्या महाराष्ट्रातील राजकारण रेमडेसिविरच्या साठेबाजीवरून चांगलेच तापले आहे. मुंबई पोलिसांनी रेमडेसिविर इंजेक्शन्सचा साठा केल्याचा संशय असलेल्या ब्रुक फार्माच्या संचालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेते मध्यरात्रीच पोलीस स्टेशनमध्ये पोलीस ठाण्यात पोहचले व पोलीस चौकशीवर आक्षेप घेतला. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केली आहे. सोमवारी पुण्यात माध्यमांशी बोलताना रूपाली चाकणकर यांनी ही मागणी केली आहे.
रूपाली चाकणकर यांनी माध्यमांशी बोलतान देवेंद्र फडणवीस यांना अटक करा, अशी मागणी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे केली. त्यामुळे आता गृहमंत्री यावर काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
रूपाली चाकणकर यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, सन्माननीय गृहमंञी, काल रात्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या काही साथीदारांनी मिळून पोलिसांवर दबाव निर्माण करून एका गुन्हेगाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला. वास्तविक पाहता, गुन्हा करणारा जितका दोषी असतो तितकाच दोषी गुन्हेगाराला पाठीशी घालणारा असतो. दोन्ही आरोपींना एकच शिक्षा असते,त्यामुळे सरकारी कामात अडथळा आणून त्रास दिल्याबद्धल पोलीसांनी फडणवीस आणि त्यांच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करून अटक करावी. यासोबतच त्यांनी या ट्वीटमध्ये # चुकीला माफी नाही हा हॅशटॅग देखील वापरलेला आहे.