रस्त्याला वाली नसल्याने दयनीय अवस्था : दोन वर्षात महापुरामुळे दुरवस्था : महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष
प्रतिनिधी /खानापूर
बेळगाव-पणजी राष्ट्रीय महामार्गापैकी रुमेवाडी क्रॉस ते करंबळ क्रॉस रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावर पुन्हा खड्डय़ांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. गेल्या आठवडय़ात अवकाळी पावसामुळे खड्डय़ांची संख्या अधिकच वाढली आहे. खड्डय़ांमध्ये बाजूच्या हॉटेल, गॅरेजमधून येणारे पाणी साचत आहे. पाणी भरलेल्या खड्डय़ांतून वाहन चालवताना वाहनधारकांचे छोटे-मोठे अपघात होत आहेत. या रस्त्याला वाली कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
रुमेवाडी कत्री ते करंबळ कत्रीपर्यंतच्या रस्त्याची दोन वर्षात महापुरामुळे दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर वरचेवर खड्डे पडतात. त्याची तात्पुरती दुरुस्ती होते. पण पुन्हा ये-रे माझ्या मागल्या, अशीच अवस्था निर्माण होत आहे.
गेल्या दोन वर्षात पडलेल्या खड्डय़ांची करंबळमधील युवकांनी दुरुस्ती केली. डॉ. अंजली निंबाळकर यांनीही कार्यकर्त्यांसह श्रमदान करून खड्डे बुजविले होते. पण रहदारीमुळे पुन्हा खड्डे पूर्ववत झाले आहेत. या ठिकाणी मोटार गॅरेज तसेच विविध दुकाने आहेत. या दुकानांकडून येणारे पाणी निचरा होण्याची व्यवस्था नाही. यामुळे गॅरेज व इतर व्यवसायांच्या ठिकाणांहून येणारे पाणी या रस्त्यावर वाहून येत असल्याने खड्डय़ांची व्याप्ती अधिकच वाढत आहे.
रस्त्याची उंची वाढविणे गरजेचे
या खड्डय़ांमुळे दुचाकी, चार चाकी वाहने चालविणे अवघड जात आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला शेतीवाडी आहे. यामुळे रुमेवाडी कत्री ते करंबळ कत्रीपर्यंत रस्त्याची उंची वाढवणे अत्यंत गरजेचे आहे. हा रस्ता महामार्ग प्राधिकरणाच्या कक्षेत आहे. त्यामुळे अधिकाऱयांनी याची दखल घेऊन रस्त्याची उंची वाढविली तरच रस्ता मजबूत राहणार आहे. अन्यथा दिवसेंदिवस रस्त्याची अधिकच दुरवस्था होणार आहे. महामार्ग प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी याची दखल घेऊन या रस्त्याची उंची वाढविण्याचे काम तातडीने हाती घ्यावे, अशी मागणी केली जात आहे.