कोकणात कोरोना वाढीचा दर कमी झाला आहे. तथापि दर कमी झाला म्हणून लोकांनी निश्चिंत राहणे हिताचे नाही.
रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिह्यात कोरोना रुग्ण वाढीचा वेग मंदावला आहे. अर्थात याचवेळी प्रशासनाला आणि लोकांना अधिक दक्ष राहून काम करण्याची गरज आहे. लस येईल आणि त्यानंतर कोरोनाला पायबंद घालू असे काही लोकांना वाटत होते. राष्ट्रीय स्तरावरून तसेच जागतिक स्तरावरून मात्र वेगळ्या सूचना देण्यात येत आहेत. लोकांनी लसीवर अवलंबून राहण्यापेक्षा निर्देशक तत्त्वांचे परिपूर्ण पालन करून जीवन जगावे असे आरोग्य संघटनांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर लोकांना काळजीपूर्वक जीवन जगण्यातून तूर्त तरी सुटका नाही.
सिंधुदुर्ग जिह्यात आतापर्यंत 4060 लोक बाधित असल्याचे आढळले आहेत. यापैकी 825 जण सक्रिय रूग्ण असून 103 लोकांचे मृत्यू झाले आहे. सिंधुदुर्गात रूग्ण बरे होण्याचा दर 75 टक्क्यांवर पोहोचला आहे. ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात कोरोनाबाधित रूग्णसंख्येत झपाटय़ाने वाढ झाली. मृत्यूदरही वाढला होता. या पार्श्वभूमीवर नव्या रूग्णांची संख्या मात्र पूर्वीच्या प्रमाणात वाढत नसल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी दरदिवशी 80 ते 90 रुग्ण आढळत होते. मात्र अलीकडे काही दिवसात दर दिवसाची आकडेवारी 20 ते 30 मध्ये थांबली आहे.
रत्नागिरी जिह्यात देखील वाढीचा वेग मंदावला आहे. आतापर्यंत 7724 जण बाधित असल्याचे आढळून आले. 277 जणांचे मृत्यू झाले आहेत. नव्याने वाढणाऱया रूग्णांची संख्या विशिष्ट मर्यादेत राहत आहे. यापूर्वी रत्नागिरी जिह्यात दरदिवशी 100 हून अधिक रूग्णांची भर पडत असे. सध्या आठवडाभर ते मान कमी आले आहे. आठवडाभर दर दिवशी वाढणारी रूग्ण संख्या 100 पेक्षा कमी असल्याचे आढळले आहे.
दोन्ही जिह्यात ग्रामीण क्षेत्र अधिक आहे. तेथील जीवनशैली विशिष्ट आहे. या जीवनशैलीमुळे ग्रामीण भागात रोगाचा प्रसार खूपच मर्यादेत झाल्याचे दिसून येते. दोन्ही जिह्यातील तालुक्याची ठिकाणे असलेल्या गावांमध्ये रूग्ण वाढ मोठय़ा प्रमाणात दिसून येत आहे. शहरी जीवनशैली धावपळीची त्याहीपेक्षा गर्दीची आहे. कोरोना काळात गर्दी टाळून व्यवहार करणे जास्त महत्त्वाचे आहे. परंतु अनेकजण हे लक्षात घेत नसल्याने रोगाला बळी पडत आहेत. दोन्ही जिह्यात अँटीजेन टेस्ट मोठय़ा प्रमाणात घेतली जात आहे. यामुळे बाधित व्यक्तीविषयीचा अहवाल झटकन पुढे येतो. संशयास्पद व्यक्तीला अहवाल येण्याची प्रतीक्षा करावी लागत नाही. चाचणीसाठी नमुना दिल्यापासून अहवाल येईपर्यंतच्या काळात अनेक रूग्ण मोकळेपणे वावरत असल्याचे दिसून येत होते. या काळात रोगप्रसारदेखील होत होता. आरटीपीसीआर चाचणी विलंबाने येणाऱया अहवालामुळे दरम्यानच्या काळात रोग प्रसार होण्याची शक्यता वाढत होती. ऍंटीजेन टेस्टमुळे झटपट अहवाल व बाधिताला समाजापासून पटकन अलग करणे शक्य होत आहे. एकूणच या टेस्टमुळे रूग्ण वाढीला आळा बसला आहे.
एका बाजूला टेस्टचे चांगले फायदे पुढे येत आहेत. त्याचवेळी अनेक आरोग्य कर्मचारी अशा चाचण्या करण्यास आरोग्य विभागाला सहकार्य देत नसल्याचा मुद्दा पुढे आला आहे. रत्नागिरी जिह्यात दापोली तालुक्यात 8 प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. या सर्व ठिकाणी अँटीजेन टेस्टची सर्व साधने देण्यात येत आहेत. या सर्व ठिकाणी संशयित व्यक्तींच्या तपासण्या व्हाव्या असे निर्देश आरोग्य विभागाने दिले आहेत. प्रत्यक्षात 8 पैकी 7 केंद्रांमध्ये आरोग्य कर्मचाऱयांनी अशा तपासण्यांना विरोध केला आहे. यामुळे रूग्णांचा झटपट शोध घेण्याच्या योजनेला धक्का बसला आहे. राज्य सरकारकडे चाचण्या वाढवा म्हणून मोठय़ा प्रमाणात विरोधक तगादा लावत आहेत. सुरुवातीला टंचाई असलेली अँटेजेन चाचण्यांची साधने आता उपलब्ध झाली आहेत. तथापि वापर करण्याचे कौशल्य आणि इच्छाशक्ती आरोग्य यंत्रणेकडे आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे. आरोग्ययंत्रणेचे जे कर्मचारी अशा चाचण्यांना नाही म्हणतात त्यांना कामाचे प्रशिक्षण देणे आणि कामाचे महत्त्व समजावून सांगणे हे काम वरिष्ठांनी केले पाहिजे. रत्नागिरी जिह्यात तशी दखल वरिष्ठ घेतात का असा प्रश्न निर्माण झाला आहे. आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी आपापल्या योजनांप्रमाणे वागून अधिक चाचण्यांच्या धोरणाला खोडा घालत असतील तर त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला पाहिजे. अन्यथा लढाई लढण्यासाठी तयारी कमी पडली असे होईल.
कोकणात कोरोना वाढीचा दर कमी झाला आहे. तथापि दर कमी झाला म्हणून लोकांनी निश्चिंत राहणे हिताचे नाही. अनेक देशांमध्ये कोरोना रूग्ण वाढीचा दर कमी झाला आणि शिथिलता आली. त्यातून कोरोनाने पुन्हा उचल खाल्ली. या रोगाची दुसरी लाट त्या देशांमध्ये आल्याचे दिसून येत आहे. कोकणात कोरोनाची दुसरी लाट येऊ नये म्हणून आरोग्य यंत्रणेतील कर्मचारी, संपूर्ण अधिकारी व लोकांनी जास्त जागरूक राहिले पाहिजे. कमी झालेला रूग्ण वाढीचा दर कायम टिकावा म्हणून सामाजिक अंतर, मुखपट्टी, वारंवार हात धुण्यासारखे उपाय यापुढे दीर्घकाळ करत राहणे आवश्यक ठरणार आहे.
गणेशोत्सव काळात गावी आलेल्या लोकांमुळे कोरोना प्रसार मोठय़ा प्रमाणात झाला होता. राजकारणी लोकांनी आपले हेतू साध्य करण्यासाठी गणेशोत्सव काळात चाकरमान्यांना गावी येऊ दिले. पंढरपूरची वारी रद्द करण्याचा कठारपणा मंत्री दाखवू शकत होते. मात्र चाकरमान्यांना मुभा देण्याचे काम नेमके कोणत्या उद्देशाने करण्यात आले असा प्रश्न उपस्थित होत आहे. कोरोनातून मुक्ती होईपर्यंत अधिक नियंत्रित जीवन जगण्याच्या मानसिकतेचा प्रसार झाला तरच या रोगाला आळा घालणे शक्य होणार आहे.
सुकांत चक्रदेव