देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 67 हजार 635
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोना रूग्णांच्या डिस्चार्ज करतानाच्या नियमावलीत बदल करण्यात आला आहे. नव्या नियमांनुसार प्राथमिक लक्षणे किंवा अति सौम्य लक्षणे असल्यास सलग तीन दिवस रूग्णाला ताप आला नाही तर डिस्चार्ज दिला जाईल. यानंतर त्यांना सात दिवस होम क्वारंटाईनचे पालन कारावे लागेल. यानंतर कोणत्याची चाचणीची आवश्यकता नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सोमवारी दिली. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 67 हजार 635 झाली आहे. 44 हजार 29 रूग्णांवर उपचार सुरू असून 20 हजार 916 रूग्ण पूर्ण बरे झाले आहेत. आतापर्यत 2206 जणांचा मृत्यू झाला आहे, असेही त्यांनी सांगितले.
आरोग्य सेतू ऍप सुरक्षितच
आरोग्य सेतून ऍपच्या माध्यमातून रूग्णाची माहिती इतरांना उपलब्ध होईल. हे ऍप पूर्ण सुरक्षित असून यामुळे डाटा सुरक्षेला कोणताही धोका नाही. गोपनीयता अबाधित राहण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. जास्तीत जास्त 60 दिवसांचा डेटा ठेवला जाईल. लवकरच आरोग्य सेतून ऍप डाऊनलोड करणाऱयांची संख्य़ा 10 कोटी होईल. तसेच आयसीएमआरने कोरोना चाचणीसाठी एलिसा टेस्ट सुरू करणार असल्याचेही अग्रवाल यांनी स्पष्ट केले. मागील 24 तासांमध्ये देशभरात 4213 नवे रूग्ण सापडले. तर 1559 रूग्ण पूर्ण बरे झाले आहेत. आता रूग्ण बरे होण्याचा टक्का हा 31 वर पोहाचला आहे.
ऊर्जा मंत्रालयात अधिकाऱयाला कोरोनाची बाधा
दिल्लीतील ऊर्जा मंत्रालयातील अधिकाऱयाला कोरोनाची बाधा झाली आहे. यामुळे श्रम शक्ती भवन इमारतीमधील सहावा मजला सील केला आहे. मंत्रालयाने ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली. मात्र या कार्यालयाचे कामकाज सुरू राहिल, असेही स्पष्ट केले आहे.