प्रतिनिधी / पणजी
रूपशा नादीर बांके हा चित्रपट एका युद्धात लढणाऱया सैनिकावर आधारित असून ब्रिटीश काळातील स्वदेशी चळवळीचे दर्शन यात घडविण्यात आले आहे. तसेच या चळवळीदरम्यान हा सैनिक आपल्या नशीबाच्या संघर्षाशी लढतो. या सैनिकाची कथा पुढे नेताना चित्रपटात अनेक ऐतिहासिक घटनांचा उल्लेख करण्यात आला आहे. तिभागा चळवळ, 1947 फाळणी, आणि बांग्लादेशची स्वातंत्र्यचळवळीचे यात दर्शन घडविण्यात आले आहे. यंदा आंचिममध्ये कंट्री फोकस म्हणून बांग्लादेशची निवड करण्यात आली आहे. तसेच यंदा बांग्लादेशाचे स्वातंत्र्याचे 50वे वर्ष आहे आणि भारत व बांग्लादेशमधील मुत्सुद्दी संबंधाचेही 50वे वर्ष असल्याची माहिती रूपसा नोदीर बनके चित्रपटाचे दिग्दर्शक तन्वीर मुक्कमल यांनी 51व्या आंचिममध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
स्वातंत्र्यानंतर बांग्लादेश विकसित होत आहे. बांग्लादेशला स्वातंत्र्य मिळाल्यामुळे देश पुढे जात आहे. शौमित्र चटर्जी हे उत्तम कलाकार होते. जन्मजात कलाकार ते होते. त्यांनी स्वतः भूमिका तयार केल्या. बांग्लादेश सिनेसृष्टीने एक चांगला कलाकार गमावला. विद्यापीठकाळात सत्यजित रे यांचे चित्रपट पाहिले आहेत. सत्यजित रे हे उत्तम लेखक व फिल्ममेकर होते. आपल्या विचारांबद्दल ते स्पष्ट होते. सत्यजित रे बद्दल लोकांना आदर किंवा त्यांचे चित्रपट आवडतात. परंतु त्या चित्रपटातून शिकण्याची तळमळ नाही. सत्यजित रे यांच्या नजरेतून शिकले पाहिजे. बहुतांश लेखक हे महिलांबद्दल वेगळी प्रतिमा तयार करतात. परंतु सत्यजित रे यांच्या नजरेतून महिला यासुद्धा माणूस आहे याची जाणीव करून देतात असे मत मुक्कमल यांनी यावेळी व्यक्त केले.
सिनेमातून कोरोना काळानंतरचा काळ मांडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. यापूर्वी बांग्लादेशचे चित्रपट पुढे आले नाहीत. परंतु महोत्सवातून बांग्लादेशची संस्कृती व चित्रपट मांडण्यात आले आहेत अशी माहिती महोत्सव संचालक चैतन्य प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कंट्री फोकस बांग्लादेश या विभागाचा ‘रूपशा नोदीर बांके’ या चित्रपटाने उद्घाटन करण्यात आले. यावेळी गोवा मनोरंजन सोसायटीचे उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई, चित्रपटाचे दिग्दर्शक तन्वीर मुक्कमल व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी फळदेसाई यांच्याहस्ते उपस्थित मान्यवरांना स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.