‘कोरोना’च्या धास्तीमुळे ग्रामस्थांकडून विरोध
वार्ताहर / रेडी:
‘कोरोना’चा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी परदेशातून सर्व प्रकारच्या वाहतुकीला बंदी असतांना रेडी बंदरात इंडोनेशिया येथून सिंगापूरमार्गे एक जहाज मायनिंग वाहतुकीसाठी दाखल झाले आहे. मात्र, या जहाजाला रेडी पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून जोरदार विरोध करण्यात आला असून जहाज परत पाठवण्याची मागणी करण्यात आली आहे.
28 एप्रिलला रेडी बंदरात मुंबईहून सदर जहाज दाखल झाले आहे. या जहाजावर एकूण 21 कामगार आहेत. त्यापैकी दोघांच्या हातावर ‘क्वारंटाईन’चे शिक्केही आहेत. रेड झोन, हॉटस्पॉट असलेल्या मुंबईवरून MV- DARYA JAYA जहाज रेडीत आल्यामुळे ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर रेडी पंचक्रोशी ग्रामस्थांनी या जहाजाला जोरदार विरोध केला. दरम्यान, जहाजावरील कामगार बाहेरील असल्याने या बोटीवर काम करण्यासाठी जाणाऱया स्थानिकांच्या जीविताला धोका होऊ शकतो. त्यामुळे मुंबईहून आलेल्या कामगारांसह अधिकाऱयांना क्वारंटाईन करा. जहाज भरू देणार नाही, ते माघारी पाठवा अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. रेडी पोर्टच्या अधिकाऱयांना जहाज परत पाठविण्याबाबत पत्र देण्यात यावे, अशी मागणीही ग्रामस्थांनी रेडी ग्रामपंचायतीकडे केली. याबाबत मेरीटाईम बोर्डाशीही चर्चा करण्यात आली असून गुरुवारी जिल्हाधिकाऱयांची भेट घेणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अजित सावंत, आबा कोंडस्कर, बाळा दळवी, पंचायत समिती माजी सदस्य चित्रा कनयाळकर, युवा सेनेचे सागर नाणोसकर, ग्रा. पं. सदस्य नामदेव राणे, ग्रामस्थ संतोष मांजरेकर, श्रीकांत राऊळ, सुमित राणे, भूषण मांजरेकर, सौरभ नागोळकर, अभिजित राणे, सदा धुरी यांच्यासह रेडी ग्रामस्थ उपस्थित होते.
रोजगारही अवलंबून
दरम्यान, जहाजावर ग्रामस्थांच्या रोजगाराचाही प्रश्न अवलंबून आहे. त्यामुळे काही ग्रामस्थांनी सदर जहाज येथेच राहवे, अशी मागणी केली आहे. त्यामुळे आपण ग्रामपंचायतीमार्फत जिल्हाधिकारी व संबंधित अधिकाऱयांना पत्र देऊन ग्रामस्थांच्या दोन्ही बाजू मांडल्या आहेत. आपण गावच्या हिताचा योग्य तो निर्णय घेणार असल्याचे सरपंच रामसिंग राणे यांनी सांगितले.