मालवाहू ट्रकांमुळे जिह्याला धोका : वाहनांच्या पाच किलोमीटर रांगा
गोवा सीमेवर प्रत्येक वाहनांची 20 ते 25 मिनिटे तपासणी सवलती मिळताच गाडय़ांची वर्दळ
मयुर चराटकर / बांदा :
टाळेबंदीतील वाढीबरोबर काही सवलती मिळताच सोमवारपासून गोव्याच्या दिशेने जाणाऱया गाडय़ांची प्रचंड वर्दळ वाढली. यात नव्वद टक्के गाडय़ा परजिल्हय़ातून आलेल्या होत्या. मात्र, कोरोनामुक्त गोवा राज्यात प्रवेश पडताळणी करून देत असल्याने महाराष्ट्राच्या हद्दीत सुमारे चार ते पाच किलोमीटरच्या रांगा लागत आहेत. तर या गाडय़ांचे चालक व क्लीनर बांदा शहरातील बाजारासह इतर भागात मुक्तसंचार करीत आहेत. या मालवाहू गाडय़ा मुबंई, पुणे, कर्नाटक, कोल्हापूर या भागातून येत असल्याने त्यातील एकाला जरी कोरोनाची लागण झाली, तर याचा सर्वात जास्त धोका बांदा शहर परिणामी जिह्याला होऊ शकतो. अनेक ठिकाणी मालवाहू गाडय़ांच्या माध्यमातून कोरोनाची व्हायरसच पोहोचल्याची घटना झाल्या असल्यामुळे जिल्हाधिकाऱयांनी अशा गाडय़ांना प्रवेश देतानाच ठरावीक गाडय़ांच्या मर्यादा ठेवण्याची मागणी होत आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा कोरोनामुक्तीच्या तोंडावर जात असताना अलिकडेच एक रुग्ण आढळल्याने पुन्हा जिल्हा ऑरेन्ज झोनमध्ये अडकला. जिह्याच्या शेजारी असलेले गोवा राज्य देशातील पहिले कोरोनामुक्त राज्य असल्याने गोवा सरकारच्यावतीने विशेषतः राष्ट्रीय महामार्ग तपासणी नाका असलेल्या पत्रादेवी येथे कडक तपसणी नाका उभारला आहे. गोव्यात जाणाऱया प्रत्येक वाहनाचे व त्यातील व्यक्तींची या ठिकाणी कसून चौकशी करीत आरोग्य तपासणीही केली जाते. कोणत्याही परिस्थितीत अवैधरित्या गोव्यात कोणालाही प्रवेश देता नये, अशा कडक सूचना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिल्या आहेत. त्यासाठी लागणाऱया सर्व सुविधा त्यांनी प्रत्येक तपासणी नाक्यावर दिल्या आहेत. त्यासाठी लागणारी कर्मचारी संख्याही मोठय़ा प्रमाणात ठेवली आहे. त्यामुळे गोव्यात जाणाऱया वाहनाला प्रवेशासाठी (रुग्णवाहिका सोडून) किमान 20 मिनिटे लागतात. परिणामी गाडय़ाच्या रांगा चार ते पाच किलोमीटरपर्यंत लागून राहतात.
मुंबई, पुणेसह इतर राज्यातून गाडय़ा
मुंबई, पुणे, कोल्हापूर व इतर राज्यातून हजारो किलोमीटर अंतरावरून गोव्याला जातात. दरम्यान, येत असताना वाटेत त्यांना कदाचित रेडझोनमध्ये सुद्धा विश्रांतीसाठी वास्तव्य करावे लागत असेल. तर काही वाहने रेडझोनमधून येतात. तर काहीचे चालक रेडझोनमध्ये वास्तव्यात असतात. असे असताना त्यांना जिह्यात ई-पासेसच्या आधारावर प्रवेश दिला जातो. जिह्यात आंबोली किंवा खारेपाटण तपासणी नाक्यावरून प्रवेश देत असताना त्यांची नोंदणी करून लगेच मार्ग मोकळा करून दिला जातो. मात्र, सिंधुदुर्ग जिह्यातील तपासणी नाक्यावरून गाडी गोव्याच्या दिशेने जात असताना अशा वाहनांना गोव्यात प्रवेश देण्यासाठी गोवा राज्य सीमेवरील बांदा शहरात सुमारे एक एक दिवस प्रवेशासाठी प्रतिक्षा करावी लागत आहे. परिणामी यातील चालक किंवा क्लीनर आपल्या प्रातविधी करण्यासाठी रस्त्याच्या शेजारी बसतात. काहीजण आंघोळीसाठी येथील कालव्यातील पाण्याचा वापर करतात. जेवण, नाष्टासाठी बांदा बाजारपेठेत मुक्तसंचार करीत खरेदी करत असतात. जर यातील एक जरी चालक किंवा क्लीनर कोरोनाबाधीत असला तर याचा सगळय़ात जास्त धोका बांद्याला व परिणामी जिह्याला होऊ शकतो. इन्सुली येथून मोठय़ा प्रमाणात खडी वाहतूक सुरू झाल्याने त्या वाहनांच्या रांगेत सुमारे शंभरहून अधिक डंपर त्या ठिकाणी त्या गाडय़ात मिसळतात. तर खडीची ट्रिप खाली करून डंपरचालक आपआपल्या घरी जातात. यात खेडेगावातील डंपरचालकांची संख्या मोठय़ा प्रमाणात असल्याने ते खेडेगावात जातात. त्यापासून मोठय़ा प्रमाणात धोका आहे.
पालकमंत्री, जिल्हाधिकाऱयांनी लक्ष द्यावे
यात कोरोनाबाधीत एखादा असल्यास त्यांच्या असलेल्या प्रतिकारशक्तीमुळे कोरोनाची लागण असल्याचे दिसणार नाहीत. मात्र, शहरात मिसळत असल्याने त्यांच्यापासून जिह्याला धोका आहे. त्यामुळे पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांनी ज्या भागातून गाडय़ा येतात, त्यांना मर्यादीत गाडय़ा सोडण्याचे आदेश द्यावेत. तसेच गोव्यात होणारी खडी वाहतूक बंद करावी. गोव्यात जाणाऱया मालाची वाहतुकीची कोंडी जिह्यातील महामार्गावर होते. त्यासाठी गोव्यात तातडीने तपासणी करण्यासाठी गोवा सरकारला अजून एक कक्ष उभारण्यात यावा. जेणेकरून एकावेळीला किमान 20 मिनिटात चार अधिक गाडय़ा सोडण्यात येतील. त्यामुळे महामार्गावरील ताण कमी होईल.
गोव्यात प्रेवश नाकारलेल्यांचा बांद्यात वावर.
गोव्यात कोणीही नोकरीधंद्यासाठी जाणाऱया वाहनधारकांना गोव्यात प्रवेश द्यायचे असल्यास किमान 14 दिवस अलगीकरण कक्षात ठेवणे बंधनकारक आहेत. त्यातच बिगर गोमंतकीयांना एका दिवसाचे अडीच हजार रुपये मोजावे लागतात. मंगळवारी सकाळी गोवा कळंगुट येथे वास्तव्यास असणारे गुजरातमधील कुटुंब गोव्यात जात होते. मात्र, त्याठिकाणी कागदपत्रांची पूर्तता नसल्याने त्यांना गोव्यात प्रवेश नाकारला. त्यामुळे ते वाहन बांदा बसस्थानकात बसून होते. त्यात एक कोरोनाबाधीत रुग्ण असेल तर त्यापासून शहरात लागण होऊ शकते.
बांदा शहरातून संतप्त प्रतिक्रिया
गोव्यात जाणाऱया वाहनांची राग बांद्यात लागली व त्यातील माणसे बाजार व महामार्गावर मोकळे फिरत असल्याने शहरवासियांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. तर अनेकजण या गाडय़ा गोव्यात ठेवून तपासणी करा, अशी मागणी दबक्या आवाजात करीत आहेत. बांदा शहर हे नेहमी अन्यायाविरोधात रस्त्यावर उतरणारे. मात्र, देशावर ओढवलेल्या परिस्थितीत लक्षात घेत बांद्यातील नागरिक संयमाने वावरत आहे. तर काही दानशूर व्यक्ती या रस्त्यावर उभे असणाऱयांना मदतीचा हातही देत आहेत. त्यातच आपत्ती व्यवस्थापन कलम व संचारबंदी उल्लंघन होईल, या भीतीने शांत आहेत.