प्रतिनिधी/कोल्हापूर
रेड झोन असणाऱ्या जिल्ह्यांमधून कोल्हापुरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा सक्तीने स्वॅब घेऊन त्याला संस्थात्मक अलगीकरण करा. त्याचबरोबर खासगी हॉटेल, आस्थापनामध्ये अलगीकरण करुन त्याचा खर्च संबंधितांकडून वसूल करा, असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिले.
जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रांताधिकारी, पोलीस उप अधीक्षक, तहसीलदार, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याशी संवाद साधला. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, समन्वयक संजय शिंदे, जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके, प्रांताधिकारी वैभव नावडकर, उपजिल्हाधिकारी श्रावण क्षीरसागर, विक्रांत चव्हाण, हेमंत निकम आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री देसाई म्हणाले, काही बाबतीत सूट दिली याचा अर्थ पूर्णपणे शिथीलता दिलीय असे नाही. पेट्रोलिंग वाढवून लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्यार दंडात्मक कारवाई करा. अजिबात न ऐकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा.
पोलीस उप अधीक्षकांनी दररोज तपासणी नाक्यांना भेट द्यावी
जिल्ह्यातील २० तपासणी नाक्यांवरुन परवानाधारक जिल्ह्यात प्रवेश करतात. अशा ठिकाणी पोलीस उप अधीक्षकांनी दररोज भेट देवून पाहणी करावी. विनापरवाना कुणी येत असेल तर त्याला परत पाठवा. तपासणी नाक्यांवरुन प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाची वैद्यकीय तपासणी झालीच पाहिजे. त्यासाठी सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. पास घेवून येणारी व्यक्ती दवाखान्यात जाते का याची खातरजमा करा, असेही देसाई म्हणाले.
पासचा गैरवापर झाल्यास कारवाई
मुंबई-पुणे येथून येणाऱ्यांसाठी अद्याप परवानगी दिली नाही. मुंबई आणि पुणे येथून बाहेर जाण्यासाठी पोलीस विभागाकडून पास देण्यात येत आहेत. वैद्यकीय उपचार, अंत्यसंस्कार अशी कारणे सांगून पोलीसांकडून असे पास घेण्यात येत आहेत. या पासव्दारे जिल्ह्यामध्ये प्रवेश करत आहेत. अशा पासचा गैरफायदा घेतला जात असल्याचे निदर्शनास येत आहे. पोलीसांनी अशा पासची काटेकोरपणे पडताळणी करावी आणि गैरवापर झाल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर कारवाई करावी. त्याचबरोबर बाहेरुन येणाऱ्या अशा व्यक्तींचे स्वॅब घेऊन त्यांना संस्थात्मक अलगीकरणात ठेवा. सध्याचे संस्थात्मक अलगीकरण केंद्रांची क्षमता संपल्यानंतर हॉटेल तसेच खासगी आस्थापना ताब्यात घेऊन त्यामध्ये अशा व्यक्तींना ठेवा आणि त्याचा खर्च संबंधित व्यक्तींकडून वसूल करण्यात यावा, असेही जिल्हाधिकारी म्हणाले. माल वाहतूक वाहनांसाठी काम करत असणाऱ्या वाहक-चालकांची त्या-त्या आस्थापनांने त्यांच्या राहण्याची स्वतंत्र सोय करावी. ग्राम समिती, प्रभाग समितीने बाहेरुन गावात येणाऱ्या व्यक्तींवर पूर्ण नियंत्रण ठेवावे, असे ही जिल्हाधिकारी म्हणाले.
मी जरी सांगितलं.. तरी परत पाठवा
विना परवाना कुणी जिल्ह्यात प्रवेश करत असेल तर त्याला परत पाठवा. त्याविषयी कुणाचाही फोन आला तरी ऐकू नका. मी जरी फोन केला तरीदेखील त्याला परतच पाठवा. आपल्याला जिल्ह्याची सुरक्षितता महत्त्वाची आहे, असे ही जिल्हाधिकारी म्हणाले.