नियंत्रण कक्षाकडे मागणी करुन देखील मिळेना इंजेक्शन
कोल्हापूर / कृष्णात चौगले
कोल्हापूर जिह्यात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून दररोज आठशेहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे शासकीय आणि खासगी रुग्णालयेदेखील हाऊसफुल्ल होत आहेत. एकूण दाखल होणाऱ्या रुग्णांपैकी सुमारे 15 ते 20 टक्के रुग्ण अत्यवस्थ स्थितीत असल्यामुळे त्यांना रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज भासत आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांकडून दररोज सुमारे अडीच हजार इंजेक्शनची नियंत्रण कक्षाकडे मागणी केली जात आहे. पण त्यापैकी केवळ अडीचशे इंजेक्शन्स मिळत असून रेमडेसिवीरच्या टंचाईमुळे जिह्यातील मृत्यूदराचे प्रमाणदेखील वाढत आहे.
कोविड पेशंटवर उपचार सुरू असताना बहुतेक खासगी रुग्णालयातील पेशंटच्या नातेवाईकांना रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी सैरावैरा धावयला लागत होते. अनेक रुग्णालयातून नातेवाईकांनाच इंजेक्शन आणून द्या, असे सांगितले जात होते. अनेकांना मिळत होते तर काहींना त्यासाठी मोठ्या अडचणी येत होत्या. या सर्व धावपळीत वेळेत इंजेक्शन मिळाले नसल्याने अनेक रुग्ण दगावल्याच्याही घटना आहेत. यावर नियंत्रण करण्यासाठी कोल्हापूर जिल्हाधिकाऱयांनी नियंत्रण कक्षाची स्थापना केली. त्यामुळे याचे संपूर्ण कंट्रोल नियंत्रण कक्षाकडून केले जात आहे.
रुग्णालयांकडून मेडिकल प्रोटोकॉलनुसार तपासून रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी नियंत्रण कक्षाकडे केली जात आहे. या केंद्रावरील अधिकारी व कर्मचाऱयांकडून समन्वय अधिकाऱयांशी चर्चा करून ती मागणी स्टॉकीस्टकडे देऊन त्यानंतरच स्टॉकीस्टकडून थेट संबंधित कोव्हिड हॉस्पिटलला याचा पुरवठा केला जात आहे. पण मागणीनुसार शासनाकडून पुरवठा होत नसून अजूनही रुग्णांच्या नातेवाईकांची इंजेक्शनसाठी धावाधाव सुरु आहे. त्यामुळे नियंत्रण कक्षाच्या स्थापनेनंतरही रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची `फरफट’ कायम आहे.
मागणीच्या तुलनेत केवळ 10 टक्केच पुरवठा
कोविडवर उपचार केला जाणाऱया सर्व खासगी हॉस्पिटल्सकडून दररोज सुमारे अडीच हजार इंजेक्शनची मागणी केली जात आहे. वाढणाऱया कोरोनाबाधितांच्या तुलनेत अत्यवस्थ रुग्णसंख्या जास्त असल्यामुळे मागणीत वाढ होत आहे. शिवाय काही रुग्णालयांकडून मध्यम लक्षणे दिसणाऱया रुग्णांनादेखील रेमडेसिवीरचा वापर केला जात आहे. पण मागणीच्या तुलनेत केवळ 10 टक्केच इंजेक्शन उपलब्ध होत असल्याचे अन्न औषध विभागाच्या अधिकाऱयांकडून सांगितले जात आहे. परिणामी जिह्यातील मृत्यूदर वाढण्याच्या अनेक कारणांमागे रेमडेसिवीरची टंचाई हे एक प्रमुख कारण बनले आहे.
सरकारी रुग्णालयात जेमतेम पुरवठा, `खासगी'मध्ये टंचाई
शासनाकडून मागणीनुसार रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा होत नाही. त्यामुळे सरकारी रुग्णालयात उपचार घेणाऱया रुग्णांसाठी जेमतेम इंजेक्शन मिळत आहे. पण खासगी रुग्णालयांच्या मागणीनुसार त्यांना इंजेक्शनचा पुरवठा होत नाही. अत्यवस्थ रुग्णांसाठी हे इंजेक्शन वरदान ठरत असले तरी मध्यम लक्षणे असणारे रुग्ण इतर औषधांनीही बरे होतात. त्यामुळे त्यांना रेमडेसिवीरचा वापर करणे अत्यावश्यक नसल्याचे शासनाच्या आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांतील डॉक्टरांनी केवळ अत्यवस्थ रुग्णांसाठीच इंजेक्शनचा वापर करणे आवश्यक आहे.
डॉ. योगेश साळे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर.