अप्पर जिल्हाधिकारी योगेश्वर यांची माहिती : काळाबाजार रोखण्यात यश; आतापर्यंत 5841 रेमडेसिवीरचे वितरण
मनीषा सुभेदार / बेळगाव
डॉक्टरांच्या (प्रिस्क्रिप्शन) सल्ल्याशिवाय रेमडेसिवीर इंजेक्शन औषध विपेत्याला विकता येणार नाही. जिल्हय़ात दररोज किती रेमडेसिवीर येतात याची आकडेवारी प्रशासनाकडे येते आणि प्रशासनातर्फे त्याचे योग्य वितरण केले जाते. रेमडेसिवीरच्या वितरणावर प्रशासनाचे नियंत्रण असल्याने आता काळाबाजार किंवा गैरवापर थांबला आहे. आतापर्यंत बेळगावमध्ये 5841 रेमडेसिवीरचे वितरण करण्यात आले आहे, अशी माहिती अप्पर जिल्हाधिकारी योगेश्वर यांनी दिली.
रेमडेसिवीरची गरज, उपलब्धता व वितरण याबाबत ‘तरुण भारत’ला दिलेल्या खास मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली. प्रशासनाने याचे वितरण हाती घेतल्याने त्यामध्ये पारदर्शकता आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, प्रशासनाकडे नियंत्रण येण्यापूर्वी औषध दुकानातून त्याची विक्री होत असे. मात्र काही ठिकाणी आरोग्यसेवक आणि वैद्यकीय सेवेतील डी ग्रुप कर्मचाऱयांतर्फे त्याची परस्पर विक्री सुरू झाल्याने काळाबाजार सुरू झाला. याबाबत दोन गुन्हेही दाखल झाले आहेत. व्हायरल ऍक्टनुसार हे इंजेक्शन ‘हेल्थ इमर्जन्सी’ म्हणून पाहिले गेले. पहिल्या लाटेमध्ये रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल होत असे, किंवा त्या परिसराला कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केले जात असे. त्यामुळे रुग्णांची संख्या गतीने वाढण्याचे प्रमाण कमी होते.
आताच्या दुसऱया लाटेत ‘होम आयसोलेशनमुळे’ घरातील एका रुग्णापासून अनेकांना संसर्ग होतो. परंतु त्याची माहिती दिली जात नाही. असिम्टोमॅटिक रुग्णांना लक्षणे जाणवत नाहीत. त्यामुळे लॅब रिपोर्ट चुकीचा आहे, असा अंदाज ते स्वतःच बांधतात. परंतु प्रत्यक्षात त्यांना संसर्ग झालेला असतो. मात्र वेळीच उपचार न झाल्याने त्यांची प्रकृती खालावते व औषध, इंजेक्शनची गरज भासते.
सध्या रेमडेसिवीरचे वितरण कसे केले जाते? या प्रश्नावर ते म्हणाले, उत्पादन, वाहतूक, वितरण अशी ही प्रक्रिया आहे. मी नोडल अधिकारी म्हणून सूत्रे घेतल्यानंतर सर्व फार्मासिस्ट व डॉक्टरांचा ग्रुप केला. एका फार्मासिस्टने किती रेमडेसिवीरची विक्री केली हे त्यामुळे कळू शकते. कोणत्या हॉस्पिटल्समध्ये त्याचा किती पुरवठा झाला हे लक्षात येते. त्यामुळे एखाद्या हॉस्पिटलमध्ये नेमके रुग्ण किती आहेत व हॉस्पिटलला रेमडेसिवीरची आवश्यकता किती आहे, हे कळू शकते. त्यामुळे गरजेनुसार वितरण सुलभ ठरते.
रेमडेसिवीर कोणाला द्यावयाचे, याचे काही निकष आहेत का? या प्रश्नावर योगेश्वर म्हणाले, प्रथम डॉक्टरांनी त्याची गरज आहे हे स्पष्ट करायला हवे. रुग्ण आयसीयूमध्ये दाखल झालेला हवा. आणि त्याची प्रकृती गंभीर असेल तरच रेमडेसिवीर सुचविले जाते. आयसीयूमधील सर्वच रुग्णांना त्याची गरज असते असे नाही. गरीब रुग्णांना आयुष्मान भारत योजनेंतर्गत नोंदणी करता येऊ शकते.
सध्या किती हॉस्पिटल्स या ग्रुपवर आहेत? या प्रश्नावर बेळगावसह जिल्हय़ातील 57 हॉस्पिटल्स या गुपवर आहेत. रेमडेसिवीरचा रिटेल दर 1500 रुपये आहे तर हॉस्पिटलमध्ये त्याचा दर 3 हजार रुपये आहे. औषध दुकानदार ड्रग कंट्रोलरना रेमडेसिवीरच्या पुरवठय़ाबद्दल माहिती देतात. ड्रग कंट्रोलर प्रशासनाकडे ही माहिती पाठवितात. आजपर्यंत बेळगावला 5841 रेमडेसिवीरचा पुरवठा झाला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
काही फार्मासिस्टनी आणि हॉस्पिटल्सनी अधिक संख्येने नोंदणी केलेली असते, मात्र त्यांची गरज किती हे प्रशासन पडताळून पाहते व गरजेपेक्षा जास्त साठा असल्यास त्यांच्याकडील रेमडेसिवीर इतरांना वितरित करते. त्यामुळे सध्यातरी त्याचा काळाबाजार किंवा गैरवापर होण्याचे प्रमाण थांबले आहे, असेही अप्पर जिल्हाधिकारी योगेश्वर म्हणाले.
6 च्या पुढचा स्कोअर म्हणजे संसर्ग जास्त…
‘कोरोनाचा संसर्ग फुप्फुसाला होतो. एचआरसीटी ही चाचणी करून हा संसर्ग किती वाढला आहे, हे तपासले जाते. त्याचा स्कोअर असतो. 25 पैकी 5 पर्यंतचा स्कोअर हा गंभीर मानला जात नाही. पण 6 च्या पुढचा स्कोअर आला म्हणजे संसर्ग जास्त आहे. अशावेळी रेमडेसिवीर इंजेक्शन दिले जाते, असे तज्ञांनी सांगितले.
अप्पर जिल्हाधिकाऱयांकडे रेमडेसिवीरचे नियंत्रण
अप्पर जिल्हाधिकारी योगेश्वर यांना निवडणूक कामकाज हाताळण्याचा मोठा अनुभव आहे. यामुळे सरकारने बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीदरम्यान त्यांना बेळगावला नियुक्त केले. त्यांच्या प्रयत्नांनी निवडणुका सुरळीत पार पडल्या. आता जिल्हाधिकाऱयांनी त्यांची नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती केली असून त्यांच्याकडेच रेमडेसिवीरचे नियंत्रण सोपविले आहे.