अनोळखी ठरल्याने 14 जणांवर दफनविधी, मरणानंतरही सुटका नाही
प्रतिनिधी /बेळगाव
एखादा बेपत्ता झालेला माणूस लवकर घरी परतला नाही तर त्याच्या कुटुंबीयांची होणारी घालमेल बहुतेक सर्वांनीच पाहिलेली असते. यातच आपल्या घरापासून, गावापासून दूर जाऊन त्याने आत्महत्या केली आहे, याची पुसटशी कल्पनाही कुटुंबीयांना आली नाही तर वर्षानुवर्षे त्या व्यक्तीच्या वाटेवर डोळे लावून त्याची वाट पाहिली जाते. रेल्वेचे दोन्ही रूळ एकमेकांना समांतर असतात. मात्र, त्यांच्या दोन टोकांची कधीच गाठ पडत नाही. अशीच दुर्दैवी ताटातूट रेल्वेखाली आत्महत्या केलेल्या काहींची होत असते. बेळगाव रेल्वे पोलीस स्थानकाच्या हद्दीतही तब्बल 14 आत्महत्याग्रस्तांना ते शेवटपर्यंत अनोळखीच राहिल्याने मोक्षप्राप्तीही लाभलेली नाही.
आत्महत्येसाठी अनेक मार्ग अवलंबिले जातात. कोणी विष प्राशन करतो तर आणखी कोणी गळफास घेतो. विहीर, तलाव, नदीत उडी टाकून जीवन संपविण्याचे प्रकार घडतात. काहीजण स्वतःला पेटवून घेऊन यातनादायक मृत्यूला सामोरे जातात. यापेक्षाही कठोर निर्णय घेणारे रेल्वेखाली जीवन संपवतात. गेल्या दीड ते पावणेदोन वर्षांच्या काळात बेळगाव जिल्हय़ात 66 जणांचा रेल्वेखाली मृत्यू झाला आहे. यातील 39 जणांनी आत्महत्येचा मार्ग पत्करला आहे.
रेल्वेखाली आत्महत्या करणाऱयांसंबंधीची माहिती रेल्वे विभागाकडून स्थानिक पोलिसांना दिली जाते. बेळगाव रेल्वे पोलीस स्थानकाची हद्दही खूप मोठी आहे. महाराष्ट्राच्या सीमेवरील शेडबाळपासून लोंढा व गोव्याच्या सीमेपर्यंत तब्बल 203 किलोमीटरच्या हद्दीत कोणाचा मृत्यू होवो किंवा कोणी आत्महत्या करो, बेळगाव येथूनच पोलिसांना दाखल व्हावे लागते. बहुतेक वेळी रेल्वेतूनच घटनेचे ठिकाण गाठावे लागते. यासाठी त्यांच्याकडे एकही रुग्णवाहिका नाही.
2020 मध्ये रेल्वेखाली 39 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 37 पुरुष व 2 महिलांचा समावेश आहे. यापैकी 21 जणांनी आत्महत्या केली आहे तर 14 जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. यातील 4 जणांचा नैसर्गिक मृत्यू झाला आहे. एकूण 32 जणांची ओळख पटली. 2 महिलांसह 7 मृतदेहांची अद्याप ओळख पटलेली नाही.
चालू वषी 31 जुलैपर्यंत रेल्वेखाली 27 जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 17 जणांनी आत्महत्या केली आहे. 7 जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. दोघांचा नैसर्गिक मृत्यू झाला आहे. यावषी आत्महत्या केलेल्या व अपघाती मृत्यू झालेल्या सात मृतदेहांची अद्याप ओळख पटलेली नाही. तब्बल दीड वर्षांपासून 14 जणांची ओळख पटविण्यासाठी रेल्वे पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, या प्रयत्नांना यश मिळत नाही. एखाद्या आत्महत्या प्रकरणानंतर संबंधिताची ओळख पटविण्यासाठी रेल्वे पोलिसांचे प्रयत्न सुरू होतात. मृतदेहाचे छायाचित्र व त्यासंबंधीची माहिती स्थानिक वृत्तपत्रांतून प्रसिद्ध केली जाते. काही वेळा एक-दोन दिवसांत ओळख पटते तर काही वेळा पंधरा दिवस ते एक महिन्यानंतर नातेवाईक विचारणा करत येतात. आणखी काही वेळा वर्षांनुवर्षे मृतदेहाची ओळख पटत नाही.
3 ते 4 दिवस मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारातील शीतगृहात ठेवला जातो. या काळात नातेवाईक आले नाही तर महानगरपालिकेला पत्र पाठविले जाते. रेल्वेखाली सापडून मृतदेहाचा चेंदामेंदा झालेला असतो. तीन-चार तुकडे पडलेले असतात. असे अनोळखी मृतदेह रुक्मिणीनगर किंवा हिंदवाडी स्मशानभूमीत दफन केले जातात. मृतदेहाच्या अंगावरील कपडे मात्र पोलीस अनेक महिने सांभाळून ठेवतात. काही वेळा कपडय़ांवरून ओळख पटविल्याचीही उदाहरणे आहेत.
रेल्वे पोलिसांना अनेक आव्हाने पेलत काम करावे लागते. कारण, कमीत कमी साधन-सुविधांमध्ये जास्तीत जास्त सेवा द्यावी लागते. एखाद्या अनोळखीने आत्महत्या केली तर प्रसंगी खिशातून खर्च करून पुढील कारवाई करावी लागते. मृतदेह आणण्यासाठी पूर्वी एक रुग्णवाहिका होती. ती सतत नादुरुस्त होत होती. आता तिचे सुटे भाग मिळत नाहीत म्हणून ही रुग्णवाहिका खात्याकडे परत पाठवून नव्या रुग्णवाहिकेची मागणी करण्यात आली आहे. तिची पूर्तता अद्याप झालेली नाही.
रेल्वे रूळावर आढळून येणाऱया मृतदेहांच्या उत्तरीय तपासणीनंतर संबंधित व्यक्तीने आत्महत्या केली आहे की त्याचा अपघाती मृत्यू झाला आहे, याचा तपास करावा लागतो. अनेक वेळा खून पचविण्यासाठी मृतदेह रेल्वे रूळावर आणून टाकले जातात. गेल्या वषी 14 फेब्रुवारी रोजी इदलहोंडजवळ एका युवकाचा मृतदेह आढळून आला. रेल्वे अंगावरून गेल्याने मृतदेहाचे तुकडे झाले होते. त्यामुळे साहजिकच या युवकाने आत्महत्या केल्याचे चित्र दिसत होते. प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच होती.
गुरु ऊर्फ कऱयाप्पा यल्लाप्पा नाईक (वय 32, रा. बेडरहट्टी) या युवकाचा तो मृतदेह होता. खिशात सापडलेल्या एका मोबाईल क्रमांकावरून त्याची ओळख पटविण्यात आली. कुटुंबीयांनी मृतदेहाची ओळख पटविली. मात्र, तो स्वीकारण्यास कोणी तयार झाले नाही. संशयावरून पोलिसांनी तपास केला असता अनैतिक संबंधातून त्याच्या सख्ख्या भावानेच दगडाने ठेचून त्याचा खून केला व पुरावे नष्ट करण्यासाठी रेल्वे रूळावर मृतदेह टाकून दिल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी तिघा जणांना अटक करून न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. अशा प्रकरणांचाही तपास रेल्वे पोलिसांना एक आव्हान म्हणून करावा लागतो.
मृतदेहांची ओळख पटावी, संबंधितांना किमान त्याची माहिती तरी मिळावी, यासाठी सातत्याने प्रयत्न करूनही अनेक मृतदेहांची वर्षानुवर्षे ओळख पटत नाही. रेल्वेसह सर्व पोलीस स्थानकांना छायाचित्रासह पत्रे पाठविली जातात. तुमच्या पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात बेपत्ता झालेल्यांपैकी कोणाशी मृतदेहाचे वर्णन मिळते जुळते आहे का हे कळवा, अशी विनंती केली जाते. एखाद्या अनोळखीचा मृत्यू किंवा आत्महत्या प्रकरणाची फाईल बंद करण्यासाठी वर्षांनुवर्षे पत्रव्यवहार सुरू होतो. मात्र, रेल्वेखाली आत्महत्या करून बेवारसाचे मरण पत्करणारा कोण? याचा शेवटपर्यंत उलगडा होत नाही.
ओळख पटविण्याचे मोठे आव्हान!
यासंबंधी रेल्वे विभागाचे पोलीस उपनिरीक्षक शिवानंद अरेनाड यांच्याशी संपर्क साधला असता अनोळखी मृतदेहांची ओळख पटविणे मोठे आव्हानात्मक काम असते. स्थानिक वृत्तपत्रांतून आम्ही छायाचित्रे प्रसिद्धीसाठी पाठवून देतो. उन्हाळय़ात मृतदेह लवकर सडतो. त्यामुळे तीन दिवसात ओळख पटली नाही तर महानगरपालिकेला पत्र पाठवून दफनविधी केला जातो. सरण रचून मृतदेहाला अग्नी देऊ शकत नाही. कारण एखाद्या मृतदेहाबाबत कायदेशीर मुद्दा उपस्थित झाल्यास पुरलेले शव पुन्हा उकरून काढावे लागते. पावसाळा व हिवाळय़ात चार-पाच दिवसांपर्यंत मृतदेह ठेवला जातो, जेणेकरून त्याची ओळख पटावी. कुटुंबीयांना किमान त्याचे शेवटचे दर्शन घेता यावे. मानवी जीवनातील शेवटचे धार्मिक संस्कार मृतदेहावर व्हावेत, अशी आमचीही इच्छा असते. अनेक जणांच्या वाटय़ाला हे भाग्य येत नाही. गेल्या दीड वर्षांत 14 मृतदेहांची ओळख पटली नाही. त्यांचे अंत्यविधी मनपाच्या मदतीने आम्हालाच करावे लागले, असे त्यांनी सांगितले.
रेल्वे पोलीस नेहमी दुर्लक्षित
रेल्वे पोलीस विभागाकडे नेहमीच दुर्लक्ष होते. 203 किलोमीटरचे कार्यक्षेत्र असणाऱया बेळगाव रेल्वे पोलीस स्थानकात 53 पोलीस आहेत. हवालदारांची संख्या कमी आहे. गेली अनेक वर्षे पोलीस उपनिरीक्षक लाभले नव्हते. साहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांवरच काम चालविले जात होते. पोलीस स्थानक इमारतीत पावसाळय़ात गुडघाभर पाणी शिरायचे. आता त्यांना नवी इमारत मिळाली आहे. रेल्वे रूळावरून मृतदेहाची उचल करण्यासाठी पूर्वी ढकलगाडीचा वापर केला जायचा. हमालांना कामाला लावून मृतदेह हलवावे लागत होते. एक रुग्णवाहिका मिळाली, मात्र सध्या ती नादुरुस्त आहे. रेल्वे पोलीस नव्या रुग्णवाहिकेच्या प्रतीक्षेत आहेत. बेळगाव शहर परिसरात रेल्वेखाली आत्महत्येचे प्रकार वाढल्यामुळे रेल्वे रूळाशेजारी संरक्षक भिंत बांधण्याचे कामही सुरू आहे.