प्रतिनिधी/ बेळगाव
शहरात विविध विकासकामे आणि रस्त्यांचा विकास करण्याकरिता रस्ते बंद ठेवण्यात आले आहेत. टिळकवाडी परिसरातील तिसरे रेल्वेगेट परिसरात उड्डाणपुलाचे काम करण्यात येत असल्याने वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. परिणामी दुसऱया रेल्वेगेटवर वाहतुकीचा ताण वाढला आहे. अशातच रस्त्यावर खोदाई करण्यात आल्याने वाहतूक कोंडी होत आहे.
स्मार्टसिटी योजनेंतर्गत शहरातील विविध रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. तिसरे रेल्वेगेट येथे उड्डाणपुलाची उभारणी करण्यात येत असल्याने खानापूर रोडवरील वाहतूक काँग्रेस रोडने वळविण्यात आली आहे. पहिल्या रेल्वेगेट परिसरात बॅरिकेड्स घालण्यात आले आहेत. उद्यमबागकडून येणाऱया नागरिकांना टिळकवाडी, शहापूर, अनगोळ परिसरात येण्यासाठी दुसऱया रेल्वेगेटने यावे लागते. पहिल्या रेल्वेगेटने मंडोळी रोड किंवा मिलीटरी महादेवकडे जाता येत नसल्याने नागरिक दुसऱया रेल्वेगेटने जातात. दुसरे रेल्वेगेट ये-जा करण्यास खुले असल्याने वाहतुकीचा ताण केवळ दुसऱया रेल्वेवर आणि परिसरातील रस्त्यांवर पडत आहे. त्यामुळे रस्त्यांवर वर्दळ वाढली आहे. अशातच दुसऱया रेल्वेगेटकडे जाणाऱया रस्त्यावर अनगोळ नाका परिसरात खोदाई करण्यात आली आहे. कित्येक दिवसांपासून खोदाई करण्यात आली असल्याने वाहनधारकांना अडथळा निर्माण झाला आहे. परिणामी रस्त्यावर वाहतूक केंडी होत आहे. सध्या लॉकडाऊन असतानाही वाहनाधारकांना अडकून पडावे लागत आहे. त्यामुळे रस्त्यावरील अडथळा दूर करावा, अशी मागणी होत आहे.