वृत्तसंस्था/ नवी दिल्ली :
कोविड 19 व लॉकडाऊनच्या धास्तीमुळे जगासोबत देशातील सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. यामुळे सर्व प्रकारची वाहतूक बंद असून फक्त जीवनाश्यक गोष्टी पुरविण्यात येणाऱया सेवा सुरु ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक स्वस्त व जलद प्रवासाचे सर्वसामान्यांचे साधन म्हणून भारतीय रेल्वेची ओळख आहे. रेल्वेची प्रवासी वाहतूक 23 मार्चपासून बंद ठेवण्यात आली आहे. वेगवेगळय़ा प्रकारच्या अत्यावश्यक साहित्यांची वाहतूक करण्यासाठी मात्र लॉकडाऊनच्या कालावधीत 2,067 विशेष पार्सलसाठी रेल्वे धावल्या आहेत.
देशातील एकूण 2,067 विशेष रेल्वेच्या माध्यमातून 54,292 टन मालाची वाहतूक करण्यात आली असून या वाहतुकीच्या आधारे 19.77 कोटी रुपयांची कमाई झाल्याचे रेल्वेने सांगितले आहे. रेल्वेच्या विभागीय क्षेत्रांमध्ये रेल्वे मार्गाची पडताळणी करणे आणि रेल्वेला सुचना देणे तसेच उपलब्ध 82 रेल्वे मार्गावरुन या रेल्वे धावण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्यात येते.
जीवनाश्यक साहित्याचा समावेश
रेल्वेने पार्सल सेवा सुरु करुन यात गुजरात, आंध्र प्रदेश यासारख्या भागांमधून जीवनाश्यक औषधे, शेती उत्पादनाच्या साहित्यांसह दूध आणि डेअरी उत्पादनांची मोठय़ा प्रमाणात वाहतूक केली आहे.