प्रतिनिधी / बेळगाव
रेल्वेचा देशातील विस्तार वाढविण्यासाठी खासगीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वेचे पूर्णपणे खासगीकरण होणार नसून काही प्रमाणात खासगी भागीदारी देण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. यामुळे हा निर्णय प्रवाशांच्या फायद्याचाच ठरेल, अशी माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री तथा बेळगावचे खासदार सुरेश अंगडी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
रेल्वे विभागाचे खासगीकरण होणार असल्याने देशभरात अनेक भ्रम पसरविले जात आहेत. परंतु ग्राहकांच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांना अधिकच्या रेल्वे मिळणार असून, रेल्वे विभागाच्या महसुलातही वाढ होणार आहे. एकदा रेल्वे येऊन गेली की त्यानंतर रेल्वे स्टेशन मोकळेच असते. याचा फायदा खासगी रेल्वेसाठी करून घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यापूर्वीच्या काळात सरकारचे दूरदर्शन ही एकच वाहिनी होती. परंतु जेव्हा खासगी वाहिन्यांना परवानगी देण्यात आली, तेव्हा अनेक खासगी वाहिन्या सुरू झाल्या. यातून रोजगाराची निर्मिती झाली. याच पद्धतीने रेल्वेच्या खासगीकरणातूनही रोजगार निर्मिती केली जाईल, असे त्यांनी सांगितले..