प्रथमच रेल्वेमार्फत निर्यातः प्रमुख मसाले पदार्थ बांगलादेशला रवाना
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोना विषाणूच्या कारणामुळे सर्वत्र सुरळीत चालणारा प्रवास विस्कटला असल्याचे पहावयास मिळाले आहे. यामध्ये व्यापार आणि उद्योगधंदे मोठय़ा प्रमाणात प्रभावीत झाले आहेत. यादरम्यानच्या काळात 9 हजार टन मसाल्यांची निर्यात देशामधून करण्यात आल्याची माहिती आहे.
सदर निर्यातीमध्ये हळद आणि जिरे यासह अन्य मसाल्याचा समावेश आहे. या मसाल्याची निर्यात प्रामुख्याने बांगलादेशला करण्यात आल्याची माहिती आहे. कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन लावण्यात आला असल्याच्या कारणाने प्रथमच रेल्वेचा वापर करुन एखादी निर्यात करण्यात आल्याची माहिती आहे. मागील महिन्यात 5 हजार टनापेक्षा अधिक हळद, 4300 टनापेक्षा अधिक मिरे आणि 100 टन जिरे या मसाला पदार्थांना आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधून बांगलादेशला पाठविण्यात आल्याची माहिती एका अधिकाऱयांनी दिली आहे.
भारतासाठी मसाला निर्यातीस बांगलादेश एक महत्वाचा देश आहे. ज्यामध्ये देशाची एकूण मसाला जवळपास 9 टक्के निर्यात इकडे केली जाते. 2019-20 च्या दरम्यान जवळपास 1,09,950 टन मसाला बांगलादेशला पाठविण्यात आला असून याची किंमत जवळपास 1005 कोटी रुपये होते.
प्रमुख निर्यातीची बंदरे
घोजदंगा, मुंद्रा, हिली, मोहादीपूर, पेट्रापोल, नहावा शेवा यासारख्या बंदरांमधून प्रामुख्याने निर्यात करण्यात आली आहे.