कालेचे पंच किशोर गावस देसाई यांनी व्यक्त केलेले मत
वार्ताहर / काकोडा
राज्यात दक्षिण-पश्चिम रेल्वेमार्गावर होणारा दुपदरीकरण प्रकल्प हा राज्याचे हित, भवितव्य व विकास पाहता स्वागतार्ह व अत्यंत गरजेचा असल्याचे स्पष्ट मत काले पंचायतीचे माजी सरपंच व विद्यमान पंच किशोर गावस देसाई यांनी व्यक्त केले आहे. सदर दुपदरीकरण प्रकल्प हा उत्कृष्ट व योग्य वेळी सरकारने राबवला असून राज्याच्या विकासात त्याचे महत्त्वाचे योगदान मिळेल, असे देसाई म्हणाले.
सदर दुपदरीकरण प्रकल्पामुळे गोव्यातून इतर राज्यांत जाण्यासाठीचे अंतर व वेळ मोठय़ा प्रमाणात कमी होणार असल्याने प्रवासी व इतर मालवाहतुकीसाठी ते उपयुक्त व स्वस्त ठरेल. गोवा भाजी, फळे, दूध व इतर खाद्य सामग्रीसाठी इतर राज्यांवर अवलंबून असून या दुपदरीकरणामुळे त्यांचेही दर कमी होण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे कमी वेळेत पुरवठा होणार असल्याने ताजा माल गोमंतकीयांना मिळेल, असे देसाई म्हणाले.
राज्यातील बांधकाम व इतर क्षेत्रेही मोठय़ा प्रमाणात इतर राज्यांतील कामगारांवर अवलंबून असून त्यांनाही सदर रेल्वेमार्ग सोयीस्कर ठरणार आहे. गोमंतकीयांना व त्यांच्या गरजा पूर्ण करणाऱया क्षेत्रांना उत्कृष्ट, जलद व स्वस्त वाहतुकीचा पर्याय या दुपदरीकरणामुळे लाभेल. या दुपदरीकरण प्रकल्पामुळे काले ग्रामस्थांची खूप जुनी व रास्त मागणी असलेला रेल्वे उड्डाणपूल प्रकल्प मंजूर झाला असून त्याचा लाभ इतर गोमंतकीयांनाही होईल, असे देसाई यांनी सांगितले.
दिशाभूल करण्याच्या प्रयत्नांना बळी पडू नये
काही राजकारणी व सामाजिक कार्यकर्ते या दुपदरीकरणाच्या प्रकल्पासंदर्भात जनतेची दिशाभूल करत असून राज्याचे हित पाहणाऱया नागरिकांनी त्यांना बळी पडू नये. विदेशात कामाला असलेले व विदेशात राहणारे अनेक जण जे केवळ सुट्टीत मजा मारण्यासाठी गोव्यात येतात ते स्वार्थासाठी सदर प्रकल्पाला विरोध करत असून मूळ गोमंतकीयांनी कोणत्याही परिस्थितीत त्यांचा हेतू साध्य होऊ देऊ नये, असे आवाहन देसाई यांनी केले आहे.
कोळसा वाहतुकीसाठी सदर दुपदरीकरण करण्यात येत असल्याच्या आरोपाचे मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच खंडन केले असून त्याचे स्वागत करण्याची गरज आहे. अनेक जण या प्रकल्पामुळे झाडे कापली जातील अशी भीती व्यक्त करत असून त्याबदल्यात दुप्पट झाडे लावून ही भीती नष्ट करण्यात वेळ घालवावा, असा टोला देसाई यांनी हाणला आहे. प्रत्येक प्रकल्पाला केवळ विरोधासाठी म्हणून विरोध करणे हे राज्याच्या व पर्यायाने देशाच्या विकासासाठी अत्यंत धोकादायक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.