80 टक्के सुपिक जमिनीमधून होणार रेल्वेमार्ग : बेळगाव-धारवाड क्हाया कित्तूर रेल्वेमार्गाला विरोध
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव-धारवाड क्हाया कित्तूर या रेल्वेमार्गाला मंजुरी मिळाली तरी शेतकऱयांनी या मार्गाला कडाडून विरोध केला आहे. देसूर ते के. के. कोप्प दरम्यान 80 टक्के सुपिक जमिनीमधून हा रेल्वेमार्ग होणार आहे. यामुळे अल्पभूधारक शेतकरी देशोधडीला लागतील. शेतकऱयांनी खासगी सर्व्हे करत रेल्वे विभागाला 80 टक्के खडकाळ जमिनीतून प्रस्ताव दिला होता. परंतु राजकीय हस्तक्षेप करून सुपिक जमिनीतूनच रेल्वेमार्ग करण्यासाठी जोर दिला जात आहे. सुपिक जमिनीवरच राजकीय व्यक्तींचा डोळा का, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.
बेळगाव-लोंढा-धारवाड या मार्गावर जुनी रेल्वेलाईन आहे. परंतु हा मार्ग खानापूरपासून पूर्णपणे जंगलातून जातो. बऱयाच ठिकाणी जंगली जनावरांमुळे रेल्वेची गती कमी होत होती. त्यामुळे अनेक वर्षांपासून बेळगाव-धारवाड व्हाया कित्तूर रेल्वेमार्ग व्हावा, अशी मागणी होती. या रेल्वेमार्गासाठी विविध मार्गांनी सर्वेक्षण करण्यात आले. प्रारंभी सांबरा, संपगाव, बैलहोंगलमार्गे कित्तूर व तेथून धारवाड या रेल्वेमार्गाची पाहणी झाली होती. त्यासोबत वडगाव व येळ्ळूरच्या भागातूनदेखील सर्वेक्षण झाले होते. देसूर नंदिहळ्ळीमार्गे कित्तूर याही मार्गाची पाहणी झाली. यातील देसूर ते के. के. कोप्प मार्गे कित्तूर मार्गाला मंजुरी देण्यात आली.
देसूर येथून के. के. कोप्पपर्यंत सुपिक जमिनीतून हा रेल्वेमार्ग घातला जाणार आहे. याला शेतकऱयांचा तीव्र विरोध होत आहे. प्रभूनगर, गर्लगुंजी, देसूर, नंदिहळ्ळी, नागेनहट्टी, अंकलगी, नागराळ, के. के. कोप्प यासह इतर गावांमधील शेतकऱयांनी या मार्गाला विरोध केला आहे. संबंधित गावांच्या ग्राम पंचायतींमध्ये विरोधाचा ठरावही मांडला आहे.
शेतकऱयांनी सूचविला हा मार्ग
देसूर-नंदिहळ्ळी मार्गे के. के. कोप्प या मार्गापेक्षा शेतकऱयांनी आणखी एक मार्ग सूचविला आहे. या मार्गामध्ये 80 टक्के खडकाळ जमीन आहे. यामुळे शेतकऱयांचे नुकसान टाळता येणार आहे. तसेच 3 ते 4 कि. मी. ने देसूर-के. के. कोप्प हे अंतर कमी होणार आहे. अंतर कमी झाल्यास पुढील अनेक वर्षे रेल्वेला इंधन बचत करता येणार आहे. याचा विचार रेल्वे विभागाने करावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
रस्त्यावरच्या लढाईला तयार – प्रसाद पाटील (शेतकरी)
आमचा विकासाला विरोध नसून सुपिक जमिनीत होणाऱया विकासकामांना विरोध आहे. रेल्वेमार्गासाठी देसूरपासून के. के. कोप्पपर्यंत दुबार पिके घेतली जाणारी 80 टक्के सुपिक जमीन संपादित केली जाणार आहे. यामुळे अल्पभूधारक शेतकरी बेरोजगार होईल. कोणताही विकास हा शेतकऱयांना पायदळी तुडवून उपयोगी नाही. आम्ही कायदेशीर लढय़ासह रस्त्यावरच्या लढाईला तयार आहोत, असे प्रसाद पाटील यांनी सांगितले.
पर्यायी मार्गामुळे रेल्वेमार्गाचे अंतर कमी : किरण लोंढे (शेतकरी)
गर्लगुंजी, नंदिहळ्ळी, नागेनहट्टी, अंकलगी, देसूर, प्रभूनगर, नागराळ, के. के. कोप्प यासारख्या सुपिक जमिनीतून रेल्वेमार्ग काढण्याचा प्रयत्न आहे. आमचा या रेल्वेमार्गाला तीव्र विरोध असून आम्ही पर्यायी मार्ग रेल्वे विभागाला सूचविला आहे. परंतु काहींनी दिशाभूल करत त्या मार्गाला भुयारी मार्गामुळे खर्च अधिक येईल, असे दाखविण्यात आले.
असा आहे प्रस्तावित रेल्वेमार्ग
- बेळगाव-देसूर-के. के. कोप्प-कित्तूर-धारवाड
- रेल्वेमार्गाची एकूण लांबी-73.2 कि.मी.
- एकूण रेल्वेस्थानकांची संख्या-7
- एकूण ब्रिजची संख्या-140
- संपादित होणारी एकूण जमीन-335 हेक्टर
- लागणारा निधी-927.40 कोटी