नैर्त्रुत्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांचे आश्वासन
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव येथील ऐतिहासिक रेल्वेस्थानकाच्या नुतनीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मध्यंतरी लॉकडाऊनमुळे कामाची गती मंदावली होती. परंतु सध्या कामाची गती वाढली असून मार्च 2022 मध्ये रेल्वेस्थानकाचे काम पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन नैर्त्रुत्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव किशोर यांनी दिले.
राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी संजीव किशोर यांची भेट घेऊन रेल्वेच्या विकासकामांबाबत चर्चा केली. त्यावेळी रेल्वेस्थानकाच्या कामाबद्दल आढावा घेतला. हुबळी येथील नैर्त्रुत्य रेल्वेच्या कार्यालयात ही बैठक झाली. मिरज-हुबळी या मार्गाचे दुपरीकरण, रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण याविषयी संजीव किशोर यांनी माहिती दिली.
बेळगाव-धारवाड रेल्वेमार्गाच्या कामाला लवकरच सुरुवात बेळगाव-धारवाडमधील अंतर कमी करण्यासाठी कित्तूरमार्गे रेल्वेमार्ग करण्यात येणार आहे. या मार्गाला मंजुरी मिळाली असून कायदेशीर बाबींची पूर्तता केली जात आहे. त्यानंतर जमीन संपादनाच्या कामाला सुरुवात होईल, असे त्यांनी खासदार कडाडींना सांगितले. यावेळी उपमहाव्यवस्थापक आशिष पांडे, चीफ इंजिनिअर विष्णू यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.