ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
औरंगाबादजवळ मालगाडीखाली चिरडून मृत्युमुखी पडलेल्या मध्यप्रदेशातील 14 मजुरांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखांची मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केली आहे. तसेच या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या दोघांच्या उपचाराची सरकारकडून व्यवस्था करण्यात येईल, असेही चौहान यांनी म्हटले आहे.
शिवराजसिंह चौहान यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. त्यामध्ये ते म्हणतात, ‘औरंगाबादहून आपल्या भुसावळमधील मूळ गावी परतणाऱ्या मजूर बांधवांच्या आपघाती निधनाची बातमी समजली. ईश्वर दिवंगत आत्म्यांना शांती आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे मोठे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो.
या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या 14 मजुरांच्या अंत्यसंस्काराची व्यवस्था करण्यासाठी मध्यप्रदेशातील उच्च अधिकाऱ्यांचे एक पथक एका विशेष विमानाने औरंगाबादला पाठवण्यात येत आहे.हे पथक मृत मजुरांच्या अंत्यसंस्काराची व्यवस्था करेल. तसेच जखमींवरील उपचारात कोणतीही कमतरता भासणार नाही याची काळजी घेईल, असेही चौहान यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.