प्रतिनिधी/ बेळगाव
खुद्द रेल्वे राज्यमंत्र्यांच्या शहरातच रेल्वे उड्डाणपूलावरील पथदीप मागील वर्षभरापासून बंद आहेत. वाहनचालकांना या उड्डाणपूलावरून अंधारातून वाहने चालवावी लागत आहेत. उड्डाणपूलावर वळण असल्यामुळे अपघातही होत आहेत. त्यामुळे आता रेल्वेराज्यमंत्र्यांनीच अधिकाऱयांची कानउघडणी करून हे पथदीप सुरू करण्याची मागणी वाहनचालकांमधून होत आहे.
मोठा गाजावाजा करीत रेल्वे विभागाने या उड्डाणपूलाचे उद्घाटन केले. परंतु पहिल्याच पावसात पूलावरील रस्ता खचल्याने वादाच्या भोवऱयात सापडला. चौफेर टिकेनंतर हा रस्ता पुन्हा करण्यात आला. त्यानंतरही या ना त्या कारणाने हा पूल चर्चेत होता. त्यातच आता वर्षभरापासून पथदीप बंद असल्याने पुन्हा एकदा टीका होवू लागली आहे. पथदीप बंद असूनही त्याकडे अधिकारी वर्गाचे दुर्लक्ष होत आहे.
रेल्वेराज्यमंत्र्यांनी दखल घेण्याची गरज
या मार्गावरून अनेकवेळा रेल्वेराज्यमंत्री सुरेश अंगडी देखील प्रवास करतात. त्यांच्या कारकिर्दीत व प्रयत्नातून हा उड्डाणपूल तयार झाला आहे. त्यामुळे याठिकाणचे बंद असलेले पथदीप पुन्हा सुरू करण्यासाठी रेल्वेमंत्र्यांनी अधिकाऱयांची कानउघडणी करण्याची वेळ आली आहे. त्यांच्या आदेशा नंतर तरी नागरिकांना रेल्वे उड्डाणपूलावरील पथदीप सुरू होतील अशी आशा आहे.