नागरिकांतून होतेय मागणी- रुग्णसेवा देण्यातही असंख्य अडचणी
प्रतिनिधी/ बेळगाव
नागरिक बेजबाबदारपणे वागतात, रस्ते खुले दिसले की फिरत राहतात, म्हणून पोलीस प्रशासनाने काही मार्ग बंद केले आहेत. मात्र, याचा फटका वेगवेगळय़ा पातळीवर बसू लागला आहे. बेळगाव शहर आणि उपनगरी भागाला जोडणारा प्रमुख रेल्वे ओव्हरब्रिज बंद करण्यात आल्याने रुग्णसेवा देण्याच्या बाबतीतही असंख्य अडचणी येत असून मोकाट फिरणाऱयांवर कारवाई करावी. मात्र, त्यासाठी ओव्हरब्रिज बंद ठेवू नये. ते खुले करावे, अशी नागरिकांची मागणी आहे.
रेल्वे ओव्हरब्रिज बंद केल्याने अनेक समस्या निर्माण होत आहेत. गुरुवारी ब्रिजवर झालेल्या गर्दीत एक रुग्णवाहिका अडकली. यामुळे आतील रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांची कुचंबना झाली. यावेळी काही नागरिकांनी वाट काढून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, उपस्थित पोलीस कर्मचाऱयांनी पोलीस आयुक्तांचे पत्र आणल्याशिवाय बॅरिकेड्स काढता येणार नाहीत, अशी भूमिका घेतली. यामुळे समस्या निर्माण झाली होती. अखेर इतर वाहने हटवून रुग्णवाहिका वळवून दुसऱया मार्गाने इस्पितळाकडे न्यावी लागली. सध्या तातडीचे औषधोपचार गरजेचे असताना या प्रकारची अडवणूक कितपत योग्य आहे? असा प्रश्न निर्माण होत आहे.
बेळगाव शहर ते शहापूर, अनगोळ आणि टिळकवाडीचा काही भाग जोडण्याचे काम हा रेल्वे ओव्हरब्रिज करतो. दरम्यान, ब्रिज दोन्ही बाजूंनी बंद झाल्याने आपत्कालीन स्थितीत प्रवास करणाऱयांना मोठा वळसा घालावा लागतो. काहीवेळा पहिले रेल्वेगेटही बंद करण्यात येते. यामुळे दुसऱया रेल्वेगेटवर त्याचा ताण पडत असून रेल्वे फाटक बंद असताना तर काँग्रेस व खानापूर रोडवर प्रचंड गर्दी होत आहे. या परिस्थितीचा विचार करून प्रशासनाने योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे.