नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासास परवानगी देण्यापूर्वी रेल्वेशी चर्चा करायला हवी होती, असं विधान केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी पलटवार केला आहे. राज्य सरकारने लोकलबाबत कॅबिनेट मंत्र्यांशी चर्चा केली असेल. रावसाहेब दानवेंशी चर्चा करण्याची गरज नाही, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले की, रेल्वे ही देशाची संपत्ती आहे. ती कुठल्या राजकीय पक्षाची नसते. पण काही लोकांना वाटते की रेल्वे आमची खाजगी संपत्ती आहे किंवा राष्ट्रीय स्तरावरील काही गोष्टी ज्याच्यावर राष्ट्रीय स्तरावर निर्णय घ्यायला पाहिजे त्या आमच्या व्यक्तीगत आहेत. आमच्या पक्षाच्या आहेत असे वाटते. मुंबईमध्ये लोकल सुरु करावी यासाठी सर्वात मोठे आंदोलन भाजपने केले. मुंबईमध्ये कोरोना संक्रमण वाढू नये म्हणून लोकल बंद होती. आता ही संख्या घटतेय तेव्हा मुख्यमंत्री निर्णय घेणार होते. पण भाजप अगदी रस्त्यांवर, रुळांवर आडवे पडले. असे आडवे पडले की इथून आम्ही उठणारच नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
केव्हाही रेल्वे सुरु करा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असे रावसाहेब दानवे यांनी सांगितले होते. आता शिर्षासन कशाला करताय. हा सर्व जो काही प्रकार चाललेला आहे, याला उलट्या खोपडीचं राजकारण म्हणतात. काल म्हणाले सुरु करा आणि आज इथे त्यांचे लोक आले आणि रावसाहेबांची भाषा बदलली. रेल्वे काय भाजपची नोकर आहे का?, अशी विचारणा करत आपण महाराष्ट्र सरकारला सहकार्य केले पाहिजे. तुमचे तुम्ही बघा आमचे आम्ही बघु हा काय प्रकार आहे, या शब्दांत संजय राऊत यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर पलटवार केला आहे.
रावसाहेब दानवे नेमके काय म्हणाले होते ?
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी लोकल सुरू करण्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकलबाबत जो निर्णय घेतला आहे. त्याचं स्वागतच आहे. राज्य सरकारच्या सूचनेप्रमाणे येत्या 15 ऑगस्टपासून आम्ही काही प्रमाणात लोकल सुरू करू. कोरोनाची स्थितीही आता आटोक्यात आली आहे. पण निर्णय घेण्यापूर्वी राज्य सरकारने रेल्वेशी थोडी चर्चा केली असती तर बरं झालं असतं. पण तरीही सरकारच्या या निर्णयाला रेल्वे प्रतिसाद देईल, असं दानवे यांनी म्हटलं आहे.