प्रवाशांची होतेय गैरसोय : तिकीट मिळत नसल्याने विनातिकीट प्रवास
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव रेल्वेस्थानकावरील तिकीट काऊंटर काही तासच सुरू ठेवण्यात येत आहे. नागरिकांना वेळेत तिकीट मिळत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. तिकिटासाठी दिलेल्या वेळेतच उपलब्ध रहावे लागत आहे. अन्यथा एक दिवस आधी तिकीट बुकिंग करावे लागत आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच दिवसभर तिकीट काऊंटर सुरू करण्याची मागणी प्रवासी करीत आहेत.
कोरोनापूर्वी रेल्वेस्थानकावरील तिकीट काऊंटर कायम सुरू असायचे. परंतु कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून ते बंद ठेवण्यात आले. रेल्वे पूर्ववत झाल्यानंतर केवळ आरक्षण तिकीट सेवा सुरू ठेवण्यात आली होती. त्यानंतर स्थानकातील बुकिंग सेंटर सुरू करण्यात आले. परंतु काही तासच बुकिंग सेंटर सुरू ठेवण्यात येत आहे. त्यामुळे प्रवाशांना मर्यादित काळात बुकिंग करावे लागत आहे.
कोरोनाचा धोका काहीसा कमी झाल्यामुळे प्रवाशांच्या संख्येत वाढ होत आहे. आता सर्वच रेल्वे पूर्ववत सुरू झाल्या आहेत. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच बुकिंग काऊंटर पूर्णवेळ सुरू ठेवल्यास प्रवाशांची सोय होणार असून रेल्वेच्या महसुलामध्येही वाढ होणार आहे. एकीकडे सर्व व्यवहार सुरळीतपणे सुरू असताना रेल्वेचे तिकीट काऊंटर काही तासच सुरू का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. वेळ काढून एक दिवस आधीच बुकिंग करावे लागत असल्याने यावर तोडगा काढण्याची मागणी करण्यात येत आहे.
रेल्वेच्या महसुलालाही फटका
बरेच प्रवासी प्रवास करण्यापूर्वी तासभर रेल्वेस्थानकावर येत आहेत. त्यानंतर ते तिकीट काढण्यास जात आहेत. परंतु तिकीट काऊंटर बंद असल्याने बरेच प्रवासी विनातिकीट प्रवास करीत आहेत. यामुळे विनातिकीट प्रवास करणाऱयांच्या संख्येत वाढ झाली आहे. याचा परिणाम रेल्वेच्या महसुलावर होत आहे. टीसीने जर कारवाई केलीच तर दंड भरून प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे.
आणखी एक काऊंटर सुरू करणे गरजेचे
प्रवाशांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. परंतु तिकीट काऊंटर काही वेळच सुरू केले जात असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. तसेच बऱयाचवेळा तिकीट काढण्यासाठी गर्दीही होत आहे. त्यामुळे तिकीट काऊंटर पूर्णवेळ सुरू ठेवून गर्दीच्यावेळी आणखी एक काऊंटर सुरू करणे गरजेचे असल्याचे सतीश तेंडोलकर यांनी सांगितले.
-सतीश तेंडोलकर (अध्यक्ष-सिटीझन्स कौन्सिल)