कणकवली:
कणकवली रेल्वेस्टेशन येथे रेल्वेतून जिल्हय़ात दाखल होणाऱया प्रवाशांच्या हातावर क्वारंटाईनचे शिक्के मारण्याची प्रक्रिया सोमवारी सुरू करण्यात आली. दिवसभरात 330 प्रवाशांवर क्वारंटाईनचे शिक्के मारण्यात आल्याचे येथे तैनात आरोग्य पथकाकडून सांगण्यात आले.
आरोग्य पथकाकडून रेल्वेतून उतरणाऱया प्रवाशांची तपासणी व गरजेनुसार रॅपिड टेस्टही केली जात आहे. मात्र, कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन जिल्हय़ात बाहेरून दाखल होणाऱया प्रत्येकावर क्वारंटाईन शिक्का मारावा व त्या व्यक्तीने 14 दिवस क्वारंटाईन व्हावे, अशा सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी केल्या आहेत. त्याची कार्यवाही सोमवारी कणकवली रेल्वे स्टेशनवर सुरू करण्यात आली. तेथे आरोग्य अधिकारी अमोल केंद्रे, प्राथमिक शिक्षक विठ्ठल जाधव, अमित शिंदे, रवींद्र मोरे यांचे पथक तैनात आहे. दिवसभरात 11 रॅपिड टेस्टही करण्यात आल्या. मात्र, त्यात कुणीही पॉझिटिव्ह नसल्याचे पथकाकडून सांगण्यात आले.