केंद्र सरकारचे धोरण, ‘भारत गौरव’ ट्रेन्सचा प्रारंभ होणार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पर्यटनाला प्रोत्साहन मिळावे म्हणून खासगी पर्यटन कंपन्यांना रेल्वेच्या गाडय़ा भाडय़ाने देण्याची योजना केंद्र सरकारने आखली आहे. या गाडय़ांचे मार्ग, त्यांचे भाडे आणि सेवेची गुणवत्ता ठरविण्याचा अधिकारही या खासगी कंपन्यांना किंवा ऑपरेटर्सना दिला जाणार आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. यासाठी केंद सरकार ‘भारत गौरव’ या नावाची नवी योजना आणणार आहे.
यासाठी रेल्वेने 3,033 डबे राखीव ठेवलेले आहेत. या डब्यांपासून साधारणतः 150 रेल्वेगाडय़ा तयार होऊ शकतात. या रेल्वे भाडय़ाने घेण्यासाठी कोणतीही संस्था, कंपनी, विश्वस्त संस्था, गट किंवा समूह, इतकेच नव्हे तर राज्य सरकारेही अर्ज सादर करु शकतात आणि या रेल्वेगाडय़ांचा उपयोग विशेषोद्देशी (थीम बेस्ड) पर्यटनासाठी करु शकतात. विशेषोद्देश किंवा थीम याचा अर्थही रेल्वेने स्पष्ट केला आहे. त्यानुसार ‘गुरुकृपा’ या नावाखाली रेल्वेगाडय़ा भाडय़ाने घेऊन त्या शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक यांच्याशी संबंधित सर्व स्थानी नेल्या जाऊ शकतील. किंवा ‘रामायण’ या नावाने गाडय़ा घेऊन त्या प्रभू रामचंद्रांशी संबंधित स्थानी नेल्या जाऊ शकतील, अशी काही उदाहरणेही रेल्वेने दिली आहेत.
अभिनव योजना
रेल्वेची ही अभिनव आणि कल्पक योजना आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. ‘भारत गौरव’ ही योजना रेल्वेच्या सेवांमध्ये मोलाची भर घालणार आहे. आपल्या देशाचा सांस्कृतिक वारसा देशवासियांना तसेच विदेशी नागरीकांनाही अनुभवता यावा, त्याचे प्रत्यक्ष दर्शन घेता यावा आणि त्यायोगे पर्यटन व्यवसायाला अधिकाधिक चालना मिळावी, हा या योजनेचा उद्देश आहे. यासंबंधी रेल्वेअधिकाऱयांनी अनेकांशी चर्चा केली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
सोयी पुरविण्याचे उत्तरदायित्व
कोणीही रेल्वेगाडय़ांसाठी 1 लाख रुपये शुल्क भरुन नोंद करु शकेल. हे शुल्क वन टाईम पद्धतीचे असेल. प्रवाशांना निसर्गदर्शन, अन्न, टॅक्सी आदी स्थानिक प्रवास, हॉटेल मधील वास्तव्य, वास्तव्याच्या जागा, प्रवासाच्या काळातील मनोरंजन इत्यादी सुविधा गाडय़ा भाडय़ाने घेणाऱया संस्थांनी पुरवायच्या आहेत. 2 वर्षे ते 10 वर्षे या कालावधीसाठी रेल्वेगाडी घेतली जाऊ शकेल. कंपन्यांना यासाठी 1 कोटी रुपये सुरक्षा ठेव रक्कम द्यावी लागणार आहे. ही भाडय़ाची गाडी 14 ते 20 डब्यांची असू शकेल. रेल्वे केवळ मेन्टेनन्स चार्ज, हाऊलेज चार्ज आणि उपयोग शुल्क आकारणार आहे, अशीही माहिती रेल्वेमंत्री वैष्णव यांनी दिली.