तानाजी गल्लीतील स्थानिक रहिवाशांचा आक्षेप : नागरिकांची समजूत काढण्यात मनपाच्या साहाय्यक कार्यकारी अभियंत्यांना अपयश
प्रतिनिधीb /बेळगाव
तानाजी गल्ली रेल्वे फाटकाजवळील गटारीमधून सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्याने पावसाळय़ात भांदूर गल्ली परिसरात सांडपाणी साचून रहात आहे. त्यामुळे रेल्वे फाटकाजवळील गटारीचे बांधकाम करून सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी पाईप घालण्यात आली आहे. मात्र गटार वळविण्याचा प्रकार सुरू असल्याने याला स्थानिक रहिवांशानी आक्षेप घेतला आहे.
भांदूर गल्ली व फुलबाग गल्ली परिसरातील सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी तानाजी गल्ली रेल्वे फाटकाजवळ पाईप घालण्यात आली होती. पण या पाईपमधून सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्याने भांदूर गल्ली परिसरातील पाण्याचा निचरा होत नाही. पावसाळय़ात पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने रहिवांशाच्या घरांमध्ये सांडपाणी शिरते. त्यामुळे गटारीचे बांधकाम करण्यात यावे, तसेच फाटकाखालील गटारीचे बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती. त्यामुळे तानाजी गल्ली रेल्वे फाटकाजवळील गटारीचे बांधकाम करण्यात येत आहे. सदर बांधकाम गेल्या पंधरा दिवसापासून करण्यात येत असून सांडपाण्याचा निचरा बंद केला आहे. परिणामी या परिसरात सांडपाणी साचून दुर्गंधी पसरली आहे.
रेल्वे फाटकाच्या दोन्ही बाजूने गटार बांधकाम करण्यात येत असून फुलबाग गल्लीमधून येणारी गटार रेल्वेमार्गाच्या बाजूने पश्चिमेकडे वळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण यामुळे सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होणार नसल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. रेल्वेमार्गाखाली घातलेल्या पाईपचा आकारदेखील लहान असल्याने सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होणार नाही. त्यामुळे फुलबाग गल्लीमधून जाणारी गटार थेट रेल्वेमार्गाच्या खालून बांधण्यात यावी, अशी मागणी करून काम करण्यास विरोध दर्शविला. त्यामुळे महापालिकेच्या सहाय्यक कार्यकारी अभियंत्या मंजूश्री यांनी सोमवारी सकाळी पाहणी करून नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण यश आले नाही. रेल्वे फाटकाखालून गटार बांधणे अशक्मय असल्याने पाईप घालण्यात आली आहे. तसेच पाण्याचा स्लोप त्या बाजूने असल्याने गटार वळविणे गरजेचे असल्याचे सागितले. पण नागरिकांनी गटार बांधण्यास सहमती दर्शविली नाही. रेल्वे फाटकाखालून गटार थेट बांधण्यात यावी, अशी मागणी केली.