प्रतिनिधी/ बेळगाव
रेल्वे बसस्थानकाचे काम सुरू होऊन बरीच वर्षे उलटली तरी ते काम अपुरेच आहे. अलीकडेच रेल्वे बसस्थानकाच्या समोरच्या बाजूला स्वच्छतागृहाची उभारणी करण्यात आली. केवळ चार महिन्यांपूर्वीच या स्वच्छतागृहाची बांधणी झाली आहे. फरशीही बसविण्यात आली आहे. मात्र, काही जण स्वच्छतागृहात गेले असता एक फरशीच खाली गेली. त्यामुळे दोघे जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे कंत्राटदाराचा प्रताप उघडकीस आला असून याप्रकरणी म. ए. समितीचे कार्यकर्ते सूरज कणबरकर यांनी तातडीने रेल्वे अधिकाऱयांना निवेदन देऊन त्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
सरकारी काम असले तरी किमान 5 ते 6 वर्षे खराब होत नाही. मात्र, केवळ चार महिन्यांतच स्वच्छतागृहाची फरशी फुटून दोघे जखमी होतात, ही घटना अत्यंत गंभीर आहे. एका व्यक्तीच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली आहे तर दुसरी व्यक्तीही जखमी झाली आहे. मारुती कणबरकर या व्यक्तीच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. त्यानंतर त्याला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
स्वच्छतागृहाची जमीन खचून फरशी आत जाते, यावरून या कामाचा दर्जा काय असणार हे दिसून येते. केवळ तीन-चार महिन्यांमध्ये अशाप्रकारे जमीन खचत असेल तर इमारत कधी कोसळेल याची शाश्वती नाही. याप्रकरणी रेल्वे पोलीस स्थानकाच्या अधिकाऱयांना याची माहिती देण्यात आली. एकूणच या प्रकारामुळे तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.