वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक पटकावून मायदेशी परतलेल्या सायखोम मिराबाई चानूचा भारताचे नूतन रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोमवारी सत्कार केला आणि 2 कोटी रुपयाचे बक्षीस व रेल्वेमधील नोकरीत बढती दिल्याचे जाहीर केले.
‘जिद्द, कठोर मेहनत आणि गुणवत्तेच्या बळावर ऑलिम्पिकसारख्या सर्वात मोठय़ा व प्रतिष्ठेच्या स्पर्धेत यश मिळवित जगभरातील करोडो लोकांची ती प्रेरणास्थान बनली आहे. भारताचा अभिमान व इंडियन रेल्वेचा गौरव असणाऱया मिराबाईची भेट घेऊन तिचे अभिनंदन करण्याचा क्षण आनंददायक होता. असेच यश पुढेही मिळत राहो,’ अशा शुभेच्छा वैष्णव यांनी चानूला दिल्या. यावेळी तिला 2 कोटी रुपये इनाम देण्याचे तसेच रेल्वेतील नोकरीत बढती दिली असल्याचेही जाहीर केले.
2000 मध्ये ऑस्ट्रेलियातील सिडनीत झालेल्या ऑलिम्पिकमध्ये भारताच्या करनम मल्लेश्वरीने भारताला वेटलिफ्टिंगमध्ये कांस्य मिळवून दिले होते. त्यानंतर मिराबाई चानूने तिच्याहून सरस कामगिरी करीत टोकियोमध्ये रौप्यपदक जिंकण्याचा पराक्रम केला. मणिपूरची रहिवासी असलेल्या चानूला एप्रिल 2018 मध्ये नॉर्थईस्ट प्रंटियर रेल्वेमध्ये स्पेशल डय़ुटी ऑफिसरपदी (क्रीडा) बढती देण्यात आली होती.