सुरक्षेसाठी बांधकाम, अनेक दिवसांची मागणी पूर्ण : अपघात रोखता येणार
प्रतिनिधी / बेळगाव
गोगटे सर्कल ते पहिले रेल्वेगेटपर्यंत रेल्वेमार्गाच्या बाजूने संरक्षक भिंतीच्या बांधकामाला सुरूवात करण्यात आली आहे. रेल्वे विभागाच्या वतीने संरक्षक कठडे उभे करण्यात आले असून त्यामध्ये काँक्रिटच्या प्लेट बसविण्यात येणार आहेत. यामुळे होणारे अपघात रोखता येणार आहेत. या संरक्षक भिंतींचे बांधकाम करण्याची मागणी मागील अनेक दिवसांपासून करण्यात येत होती. याची दखल घेवून रेल्वे विभागाने संरक्षक भिंत घालण्याचा निर्णय घेतला
आहे.
मिरज ते लोंढा या रेल्वेमार्गाच्या दुपरीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर निश्चितच रेल्वे गाडय़ांच्या संख्येत वाढ होणार आहे. यामुळे भविष्यात कोणतेही अपघात होवू नयेत यासाठी रेल्वे विभागाच्यावतीने संरक्षक भिंतींचे बांधकाम करण्यात येत आहे.
गोगटे सर्कल ते तिसरे रेल्वेगेट परिसरात ही संरक्षक भिंत घालण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात गोगटे सर्कल ते पहिला रेल्वेगेट या दरम्यान भिंत घालण्याचे काम करण्यात येत आहे.
टिळकवाडी तसेच पहिले रेल्वेगेट परिसरात अनेक शाळा आहेत. विद्यार्थी बऱयाचवेळा मिळेल त्याठिकाणाहून रेल्वेमार्ग ओलांडून पलिकडे जाण्याचा प्रयत्न करीत असतात. यामुळे संरक्षक भिंतीची मागणी करण्यात येत होती. तसेच या परिसरात जनावरे चरण्यासाठी येतात त्यांनाही अपघात होत असतात. त्यामुळे ही संरक्षक भिंत झाल्यास अपघातांना रोखता येणार आहे.
अपघातांमुळे संरक्षक भिंतींची मागणी
दहा वर्षांपूर्वी पहिला रेल्वेगेट परिसरात शाळेत जाणाऱया मुलांना रेल्वेने धडक दिली होती. मागून येणाऱया रेल्वेची माहिती नसल्याने मोठा अपघात घडला होता. या घटनेमुळे शहर हादरले होते. तसेच या परिसरात अनेकांनी आत्महत्याही केल्या असल्याने या परिसरात संरक्षक भिंत घालण्याची मागणी दहा वर्षांपासून करण्यात येत होती.